‘एकनाथ शिंदे हे नेहमी दिल्लीला जात असतात,पण मला वाटत नाही..,’ काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. यावरुन कोणतीही समस्या नाही. प्रत्येक पक्षाला आपआपल्या जागा मिळाव्यात त्या प्रमाणे मागणी होत असते. लवकरच यावर तोडगा निघेल असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे नेहमी दिल्लीला जात असतात,पण मला वाटत नाही.., काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?
eknath shinde and girish mahajan
| Updated on: May 24, 2026 | 4:30 PM

राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा झालेली आहे, सहा जणांनी आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे. आमचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षाला दिलेला आहे. शिवसेनेने त्यांचा रिपोर्ट शिंदे साहेबांना दिला आहे. आता जागा संदर्भात महायुती मधील तिन्ही पक्ष नेते बसून चर्चा करतील आणि समन्वयाने सर्व जागांचा वाटप होईल. जळगाव आणि नाशिक तसेच संपूर्ण राज्यांमध्ये तिढा आहे, प्रत्येक पक्ष आपापल्या संख्याबळानुसार तिकीट मागत आहेत. आम्ही देखील प्रत्येक ठिकाणी भाजपसाठी तिकीट मागत आहोत आणि एक-दोन दिवसात हा तिढा सुटेल असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे नेहमीच दिल्लीला जात असतात. त्यांची काही इतर खाजगी कामे असतील. जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असे समजण्याचे काही कारण नाही. विधान परिषदेच्या जागांसाठी उपमुख्यमंत्री दिल्लीला जातील असे मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार हे एकत्रित बसून त्या संदर्भात निर्णय घेतील असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

एक-दोन दिवसात तिढा सुटेल

मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी जागेची मागणी केलेली आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन त्या पद्धतीने जागा वाटप होईल आणि काय ते ठरेल असेही महाजन यांनी यावेळी सांगितले. नाशिक आणि जळगाव दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकत्रित बसून निर्णय घेतील. अंतिम निर्णय तिन्ही नेते एकत्र बसून आणि समन्वयाने घेतील आणि एक-दोन दिवसांमध्ये या संदर्भातला तिढा सुटेल असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

अण्णा हजारे यांनी कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती आहे, जर देशातील तरुण एकत्र आले आणि जागृत झाले, तर ते देशाचे भविष्य बदलू शकतात असे म्हटले आहे. या संदर्भात विचारले असता महाजन यांनी अण्णा हजारे काय म्हणाले मला माहिती नाही. पण अण्णा हजारे यांची मी लवकरच भेट घेणार आहेत बऱ्याच दिवसांपासून माझी आणि त्यांची भेट नाही. एवढ्या एक-दोन दिवसांमध्ये आपण अण्णांची भेट घेणार आहे असे त्यांनी सांगितले.

भाजप आमदार आणि खासदारांची बैठक?

आम्ही घेतलेल्या बैठकीत कुठेही उमेदवारांच्या नावासंदर्भात आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही. आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांचं निधन झाले,त्या अंत्यसंस्कारासाठी त्यासाठी सर्व एकत्र आले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी किंवा उमेदवारीसाठी आमची कुठेही बैठक झालेली नाही असेही महाजन यांनी सांगितले.

प्रतापराव पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे का ? असे विचारता महाजन यांनी तशी अद्याप माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही किंवा तशी चर्चा देखील नाही. असो..कोणी म्हटलेलं पण नाहीए..25 ते 30 वर्षापासून जळगाव विधान परिषदेवर आमचा आमदार आहे.ही आमची सीट आहे.त्यामुळे आमचा आग्रह आहे की ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे. मात्र,उमेदवार आमचा देखील ठरलेला नाही, मात्र निश्चित ही जागा भाजपाला मिळावी त्यासाठी आम्ही आग्रही आहोत असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

पेट्रोल डिझेलची समस्या नाही, काळाबाजार

पेट्रोल डिझेलची कुठेही समस्या नाही, मात्र नागरिक पेट्रोलचा काळाबाजार करीत आहेत. अक्षरश: बाजारामध्ये प्लास्टिकचा कॅनदेखील विकत मिळत नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. काही लोक जाणून-बुजून अतिरिक्त साठा तसेच काळाबाजार करत आहेत. खरेखुरे शेतकरी सोडले तर जवळपास 80 टक्के लोक हे काळाबाजार करण्यासाठी पेट्रोल डिझेल खरेदी करीत असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

Follow Us