
मुंबई शहरावर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाशिवाय इतका मोठा हल्ला घडू शकत नाही, असे पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भंडारी यांनी म्हटले आहे. माधव भंडारी यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले. ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी माधव भंडारी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा आरोप केला. ते म्हणाले, मुंबईवर हल्ला होणार असल्याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभाग असल्याशिवाय इतका मोठा हल्ला घडणे अशक्य आहे. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि एम.एम. कलबुर्गी या हत्याकांडाद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना शिक्षा झाली. परंतु या प्रकरणात ते निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे माधव भंडारी यांनी सांगितले.
गुजरात दंगलीचा उल्लेख करत माधव भंडारी म्हणाले, हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम गुजरातमधील दंगलीपासून सुरू आहे. देशात राजकीय बदल झाल्यानंतर व्यवस्थेमुळे हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम केले जात आहे. कारण व्यवस्था म्हणजे पोलीस, महसूल, न्यायव्यवस्था तिच आहे. ही व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे, असे त्यांनी म्हटले.
माधव भंडारी यांच्या आरोपानंतर काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. ते म्हणाले, रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आहे. एखादा राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे.