महाराष्ट्रात भीषण अपघातांचा थरार, 2 दिवसात 5 जण ठार, मुंबईहून आलेल्या नवरीचाही मृत्यू

मुंबई-हैदराबाद महामार्गावर उमरगा तालुक्यातील डाळिंब या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले. तर अन्य ठिकाणी एका युवतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवाळीत काही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्रात भीषण अपघातांचा थरार, 2 दिवसात 5 जण ठार, मुंबईहून आलेल्या नवरीचाही मृत्यू
| Updated on: Oct 21, 2025 | 11:21 AM

गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध अपघात झाले आहे. या अपघातांमध्ये एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. त्यातच आता नुकतंच मुंबई-हैदराबाद महामार्गावर उमरगा तालुक्यातील डाळिंब या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले. तर अन्य ठिकाणी एका युवतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवाळीत काही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

धाराशिवमध्ये अपघात 

मुंबई-हैदराबाद महामार्गावर उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील साईप्रसाद पेट्रोल पंपाजवळ मोठा अपघात झाला. यावेळा सफारी आणि ग्रँड विटारा या चार चाकी गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. हैदराबादकडे जाणारी ग्रँड विटारा आणि सोलापूरच्या दिशेने जाणारी सफारी गाडी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये ग्रँड विटारा गाडीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. चालकांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

वाशिममध्ये सात जण जखमी

वाशिमच्या रिसोड-हिंगोली मार्गावर मुंगसाजी नगरजवळ पिकअप आणि लक्झरी वाहनाची जोरदार धडक होऊन सात जण जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकरी आहेत. झेंडूची फुले विकून ते आपल्या गावी परतत असताना अपघात झाला. जखमींना तातडीने रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी वाशिम येथे रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

इगतपुरीत तीन जण गंभीर जखमी 

इगतपुरी येथे मुंबई-नाशिक महामार्गावर वाडीवऱ्हे फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार शेतात घुसली. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृत्यू

सिंधुदुर्गमधील फोंडाघाट गांगोवाडी येथील निकिता सावंत ही युवती आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावाकडे आली होती. सकाळी आपल्या सख्या भावासोबत मामाकडे पत्रिका देऊन परत येत असताना बस आणि दुचाकीच्या दुर्दैवी अपघातात तिचा मृत्यू झाला. येत्या ३ फेब्रुवारीला निकिताचे लग्न होणार होते. तर रत्नागिरी-गुहागर चिपळूण मार्गावर मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटला. गुहागर-चिखली मार्गावर झालेल्या या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघातामुळे रस्त्यावर मच्छी पसरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. टेम्पोचा क्लीनर किरकोळ जखमी झाला आहे.

तीन जनावरांना धडक

बीड तालुक्यातील येळंब घाट येथील अहिल्यानगर-अहमदपूर रस्त्यावर सकाळी ८ वाजता एसटी बसने मागून आलेल्या ट्रकला धडक दिली आहे. या बसने रस्त्याखाली चालणाऱ्या दुचाकीसह तीन जनावरांना धडक दिली. यात दुचाकीस्वार अक्षय ढाणे गंभीर जखमी झाले, तर एक गाय दगावली.

पुण्यातील भोरमधील नसरापूर जवळील शिवगंगा नदीवरील पुलाजवळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. वेल्ह्याहून पुण्याच्या मार्केटमध्ये फुलं आणि भाजीपाला घेऊन निघालेला असताना, रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आपटून हा टेम्पो पलटी झाला. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र शेतकऱ्याच्या भाजीपाला आणि फुलांचे नुकसान झाले. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.