एटीएस थेट कोकणात… पाकिस्तानी अतिरेक्याचा हस्तक ताब्यात; रत्नागिरीत मोठी खळबळ
महाराष्ट्र एटीएसने रत्नागिरीत धडक कारवाई करत पाकिस्तानी अतिरेकी शहजाद भट्टीच्या कोकणातील जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. चिपळूणमधून एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याचे मोबाईल व डिजिटल व्यवहार तपासले जात आहेत. भट्टीने तरुणांच्या खात्यात पैसे पाठवल्याचा संशय असून, यातून दहशतवादी नेटवर्कचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी अतिरेकी शहजाद भट्टी याने अख्ख्या महाराष्ट्रातच जाळं पसरल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यात त्याच्याशी संबंधितांवर रेड मारण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजे एटीएसने अनेकांची चौकशी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालेली असतानाच आता कोकणातही भट्टने जाळे पसरवल्याचे समोर आले आहे. एटीएसने रत्नागिरीत धाड मारून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे रत्नागिरीत मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) राज्यव्यापी धडक कारवाईचे पडसाद आता थेट कोकणात पसरले आहे. पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टी याने चिपळूणपर्यंत त्याचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. एटीएसने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. चिपळूणमधील या संशयिताकडून एटीएसने मोबाईल जप्त केले आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुंची तपासणी सुरू केली आहे. यातून बरेच धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोशल मीडियातून संपर्क
प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया आणि डीजिटल ‘यूजर आयडी’च्या माध्यमातून हा युवक संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीचा संपर्क केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता की त्यामागे गुन्हेगारी किंवा दहशतवादी स्वरूपाचे व्यापक जाळे कार्यरत होते, याबाबत निष्कर्ष समोर आलेला नाही. एटीएस याचाच तपास करत आहे.
यंत्रणा सतर्क
चिपळूणमधून एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. इतरांच्या संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ही कारवाई पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित कथित डिजिटल संपर्कांच्या तपासाचा भाग असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक संशयित एटीएसच्या रडारवर असून त्यांच्या डिजिटल व्यवहारांची, मोबाईल डेटाची आणि संपर्क साखळीची कसून छाननी करण्यात येत आहे.
पैसे कुणा कुणाला मिळाले?
भट्टीने काही तरुणांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते. त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या तरुणांच्या खात्यात पैसे गेले, ते कधीपासून त्याच्या संपर्कात होते, पैशाच्या बदल्यात या तरुणांनी काय काम केले, याची माहितीही एटीएस घेत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, एटीएसने भट्टीच्या संपर्कात असलेल्या अनेक तरुणांचे मोबाईल जप्त केले आहेत. त्यातील डेटा काढला जात असून भट्टीच्या नेटवर्कची त्यातून माहिती घेतली जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.