गँगस्टरचे नंबर, महाराष्ट्रातील तरुणांशी चॅट्स अन्… पाकिस्तानच्या कुरापती सुरु, ATS च्या हाती लागला सर्वात मोठा सुगावा

अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी सोशल मीडिया हँडलर्सच्या संपर्कात आलेल्या तरुणांची चौकशी करण्यात आली असून त्यांचे मोबाईल जप्त केले आहेत.

गँगस्टरचे नंबर, महाराष्ट्रातील तरुणांशी चॅट्स अन्... पाकिस्तानच्या कुरापती सुरु, ATS च्या हाती लागला सर्वात मोठा सुगावा
ATS Maharashtra
| Updated on: Jun 05, 2026 | 8:40 AM

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर भागात एक मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानमधील एका गुंडाशी आणि सोशल मीडिया हँडलर्सशी काही लोकांचे संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने ही छापेमारी केली. या कारवाईत अनेक संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांची चौकशी केली जात असून यात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या तरुणांनी पाकिस्तानी सोशल मीडिया खात्यांवरून संवाद साधल्याची आणि नंतर ते चॅट्स डिलीट केल्याची कबुली दिली आहे.

एटीएसकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली होती. काही लोकांचे सिम कार्ड इतर व्यक्ती वापरत असल्याचा संशय आल्याने ही चौकशी सुरू करण्यात आली होती. या तपासादरम्यान एटीएसने अनेक मोबाईल फोन जप्त केले. तसेच डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे.

चौकशीत तरुणांनी नेमके काय सांगितले?

ताब्यात घेतलेल्या तरुणांची जेव्हा एटीएसने कसून चौकशी केली, तेव्हा काही संशयास्पद माहिती समोर आली. यावेळी एका तरुणाने सांगितले की, त्याला पाकिस्तानमधील एका इंस्टाग्राम खात्यावरून मेसेज आले होते. त्यांच्यात संवादही झाला, परंतु नंतर घाबरून त्याने ते सर्व चॅट्स डिलीट करून टाकले. तर दुसऱ्या एका तरुणाने कबूल केले की, त्याला पाकिस्तानच्या एका व्हॉट्सॲप नंबरवरून फोन आला होता. फोन करणाऱ्याने त्याला श्रीरामपूरमधील काही लोकांबद्दल आणि परिसराबद्दल चौकशी केली. मात्र, आपण कोणतीही माहिती दिली नाही, असा दावा या तरुणाने केला आहे.

तसेच तिसऱ्या एका तरुणाने सांगितले की, तो एका पाकिस्तानी इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करत होता. त्यानंतर त्याला त्याच्या घराविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. पण मी कोणतीही महत्त्वाची माहिती शेअर केली नाही. यानंतर ते चॅट्स डिलीट केले, असेही त्याने सांगितले.

चॅट्स डिलिट का केले?

एटीएसने या कारवाईदरम्यान संशयित तरुणांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. हे चॅट्स डिलिट का करण्यात आले आणि त्यामागे नक्की काय हेतू होता, याचा शोध घेण्यासाठी या सर्वांच्या फोनचा डेटा रिकव्हर केला जात आहे. यानंतर खरी माहिती समोर येणार आहे. तसेच एटीएसच्या छापेमारी दरम्यान काही संशयित घरी हजर नव्हते. एटीएस आता त्यांचा शोध घेत आहे.

दरम्यान पाकिस्तानमधील गुन्हेगारी नेटवर्क आणि सोशल मीडिया हँडलर्सचा या स्थानिक तरुणांचा वापर करून काही मोठा कट रचण्याचा डाव होता का, या अँगलनेही एटीएसकडून तपास केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसली तरी एटीएसने तपासाची गती आणखी वाढवली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us