मुंबई, दि.28 जानेवारी 2024 | मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. आता आज अंतरवाली सराटीत दुपारी १२ वाजता बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहे. यंदा कमी पाऊस झाला आहे. यामुळे धरणांमध्ये जलसाठा कमी झाला आहे. नागपूरमधील धरणांमध्ये आता केवळ 66 टक्के जलसाठा राहिला आहे. यामुळे प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मन की बात कार्यक्रम होणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
कराड | मंत्री छगन भुजबळ आणि नारायण राणे यांची काही वैयक्तिक मत असले तरी मी स्वतः दोघांचेही समजूत काढणार आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच मराठा समाजाला दिलेला आरक्षण कसे योग्य आहे, ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करू, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या निर्णयामुळे कुठेही ओबीसींना धक्का लागलेला नाही, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.
गोंदिया | 12 तास विद्युत पुरवठा सुरू करावा यासाठी शेतकऱ्यांकडून उपोषण करण्यात येत आहे. रात्रीच्या विद्युत पुरवठा आठ तास देण्यात येतो. त्यामुळे शेतकरी कंटाळलेत. जोपर्यंत बारा तास दिवसा विद्युत पुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. तसेच यापूर्वी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने शेतकरी आणखी संतप्त झालेत.
मुंबई : सर्व राजकिय पक्षांची मते घेऊन लोकसभा सुरक्षा व्यवस्था नियोजन केलं जातंय. देशातील सर्व विधिमंडळ लवकरच एका प्लॅटफॉर्मवर येतील. शेड्युल 10 पुनर्विचार बाबत एक समिती तयार केली आहे त्यावर चर्चा सुरू आहे, अहवाल आला की सरकार निर्णय घेईल. विधिमंडळ आणि न्यायपालिका यांचे प्रत्येकाचे स्वतंत्र अधिकार आहे, प्रत्येकानं आपल्या कार्यक्षेत्राचा सन्मान राखावा असे विधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलंय.
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेस एखादी कुस्ती आवडायची त्यावेळी महाराज स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून पैलवाणाला भेट द्यायचे. मी शाहू महाराजांचा भक्त आहे. त्यामुळे मला एखादी कृती जर आवडली तर मी माझ्या हातातील घड्याळ संबंधिताला भेट देत असतो असे म्हणत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयकुमार साळुंखे यांना आपल्या स्वतः च्या हातातील घड्याळ काढून भेट दिली.
वर्धा : सोनोग्राफी करायची असल्याचे सांगून डॉक्टरांची ३ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलांची सोनोग्राफी करायची आहे, असे सांगत ऑनलाईन पेमेंटकरिता ऑनलाईन प्रोसेस करायला सांगून ही फसवणूक केली आहे.
नाशिक : मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन अध्यादेश काढण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार चुकीचा आहे. मुळात 57 लाख नोंदी सापडल्याचं नाहीत. शासनाने मनोज जरांगे यांची दिशाभूल केली असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत बोललेलं सर्व धादांत खोट आहे असेही ते म्हणाले.
मुबई : मुंबईमध्ये देशातील सर्व पीठासीन अधिकारी यांचे संमेलन संपन्न झाले. यात काही संकल्प करण्यात आले. सर्व पीठासीन अधिकारी यांनी काही विचार मांडले. मुंबई अधिवेशनात आलेले विचार पुढे घेऊन जाऊ. वर्तमान परिस्थितीला पाहून सर्व लोकतंत्रला सर्वात सशक्त बनवायची आहे. लोकतंत्र संस्था मजबूत झाली पाहिजे, असे प्रतीपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
खेड : एमआयडीसी जागेत असणारी गोशाळा हे पवित्र काम आहे. याला राजकारण्यांनी विरोध करू नये. कोकणात रिफायनरी मी करणारच. जे रिफायनरी होऊ देणार नाही असे म्हणत होते त्यांची आता आवळात चालली आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांना लगावला. तसेच, आरक्षण मुद्यावर मी आज बोलणार नाही असेही ते म्हणाले.
वाढदिवसा निमित्त गोंदिया-भंडारा येथे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला होर्डींगवरून प्रफुल पटेल यांनी माजी पालकमंत्री परिणय फुके यांना टोला लगावला आहे.
या जागेसाठी विद्यमान खासदार सुनील मेंढे, परिणय फुके भाजपाकडून इच्छुक आहेत.राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांची तयारी सुरु आहे.
राज्य सरकार आणि पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी भूमिका स्पष्ट आहे. पण ओबीसींवर अन्याय होणार नाही असे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
महिलांना सर्वाधिक भाजपात संधी असल्याचा दावा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. भाजपामध्ये सर्वाधिक महिला आमदार आहेत. तीन ते चार महिलांना मंत्रिमंडळात संधी सरकारने द्यायला हवी. येणाऱ्या काळात महिलांना मंत्री म्हणून संधी मिळेल, असे त्या म्हणाल्या.
आरक्षण संपल्यांची ओबीसींची भावना चुकीची नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मराठे आता ओबीसीत वाटेकरी झाले आहेत. मराठा समाज मागास आहे, हे दाखवण्यासाठी सर्व यंत्रणाच कामाला लागल्याचे ते म्हणाले. ओबीसींना धक्के मारुन बाहेर काढण्यात येत असल्याचा आरोप पण त्यांनी केला. ३७४ जातींचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमातील भोंदु गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर वर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य प्रदेशातील जबलपूर मधील महिला भाविकेचे शोषण करून व्हिडिओ बनवल्याचा महिलेचा आरोप होता. पतीचा आजार दुरुस्त होण्यासाठी या बाबाने पीडित महिलेला आश्रमात राहायला सांगितले होते. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार भोंदू बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. काही महिन्यापूर्वी याच बाबाचा तपत्या तव्यावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
हुल्लडबाजी करत दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करत फटाक्याचा आवाज काढणाऱ्या वाहनांवर नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. 26 जानेवारीला ही कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस शाखेसह शहरातील सर्वच झोनमध्ये दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली.एकूण 2586 वाहनाना चालान, 50 बुलेट आणि रेसरबाईकसह 103 वाहन जप्त करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी सायलेंसर वाजवणाऱ्या 69 दुचाकी चालकांकडून अडीच लाखाचा दंड वसूल केला.
सरकारने जारी केलेल्या अध्यादेशानुसार, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणारा नाहीत.मनोज जरांगे यांच्या लढ्याला काही प्रमाणात यश मिळाले. जोपर्यंत सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी हा लढा थांबवू नये. सकल मराठा समाजाला कालच्या अध्यादेशातून काही मिळालं नाही.अध्यादेश देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. जरांगे पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वाला सुद्धा शिंदे यांनी फसवल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताबाबत उद्या सुनावणी होणार आहे. उद्या सुप्रीम कोर्टासमोर दोन्ही गट युक्तीवाद करतील. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटातील आमदारांचे निलंबन करावं या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत हे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज नगर येथे ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. लोकसभा आणि आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
रविकांत तुपकरांना सभेत शिरून कानशिलात लगावू अशी धमकी शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी दिली आहे.
नितीश कुमार भाजपसोबत जाण्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी 10 वाजता नितीश कुमार यांची आमदारांसोबत बैठक होणार आहे.
सोलापूरातील माढा तालुक्यात आज ओबीसीचा एल्गार मेळावा आयोजीत केला आहे. प्रकाश आंबेडकर या मेळाव्याला उपस्थित राहाणार आहेत.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
दिल्लीतील कालकाजी मंदिरात कार्यक्रमाचा स्टेज कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. यात 17 जण गंभिर जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे.
अध्यादेश मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे यांची बैठक आहे. या बैठकीला मराठा मोर्चाच्या पदाधीकाऱ्यांना उपर्थित राहाण्याच्या सुचना.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील जवळपास 70 टक्के बसेसच्या काचा फुटलेल्या तर बसेसही खिळखिळ्या झाल्या आहेत. अनेक बसेसला दोन्ही बाजूच्या काचा नसल्याने वृद्ध प्रवाशांना थंडीचा त्रास होत आहे. राज्यातील हजारो स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत असूनही सुविधा मिळत नसल्याने एसटीकडे प्रवासी पाठ फिरवताना दिसत आहेत. अक्कलकोटसह माढा, करमाळा आगारातील एसटीची तात्काळ दुरुस्ती करून घेण्याबाबत यंत्र अभियंत्यांनी लेखी सूचना दिल्या आहेत.
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी… पीएमपीएमएलची पुणे विमानतळ बस सेवा लवकरच सुरू होणार आहे. पीएमपीएमएलने विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला आहे. लोहगाव मार्गे वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या 21 बसच्या फेऱ्या पुणे विमानतळ इमारतीजवळ थांबवता येतील, असा प्रस्ताव महामंडळाकडून विमानतळ प्राधिकरणापुढे मांडण्यात येणार आहे. पीएमपीएमएल महामंडळाचे अध्यक्ष संजय कोलते यांनी ही माहिती दिली आहे.
निर्यात संत्र्याला आता एक किलोमागे 44 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. बांग्लादेशात संत्र्याला 88 रुपये आयात शुल्क आहे. आयात शुल्कात 50 टक्के म्हणजे किलोमागे 44 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय. सरकारच्या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी होणार आहे. जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकरांना ३० तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र उद्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष आहे. शिवसेनेच्या निकालाचं परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर होणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
मुंबई पोलीस आणि पोलिसांच्या कुटुंबियासाठी वरळीच्या सफेद मैदानावर एक धाव खकीसाठी ही मरोथॉन पार पडत आहे. आज सकाळी साडे सात वाजता स्पर्धा सुरु झाली. वरळीचे शिवसेना ठाकरे गटाचे युवा आमदार तथा युवा सेना नेते अदित्य ठाकरे यांनी मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात केली.
पुण्यात घरगुती पाईप गॅसची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने देशात पाईपद्वारे घरगुती गॅसपुरवठा वाढवा यावर भर दिला आहे. त्यामुळे पुणे शहरात 26 जानेवारी ते 31 मार्च मोहीम सुरु केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहे. सकाळी श्री दुर्ग रायरेश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभ राहणार ते उपस्थित राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी मंत्री शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांच्या विवाह सोहळ्यास राहणार उपस्थिती राहणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवली आहे. या बैठकीत आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेणार आहे. दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे.