रायगडचं कुटुंब वडील, आई आणि मुलगा, काशी फिरायला गेलं, पुढे असं काही घडलं की विश्वास बसणार नाही…
विशाल मुखर्जी यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतर जया आणि ईशान हॉटेलमध्ये परतले. त्यानंतर ते खोलीबाहेर आलेच नाहीत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तशी पोलिसांना माहिती देण्यात आली.

Maharashtra Businessman Death : वडिलांना श्रावण महिन्यात काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घ्यायचं म्हणून इशानने यात्रेची मोठी उत्साहात तयारी केली. विशेष म्हणजे आई-वडिलांची काही गैरसोय होऊ नये म्हणून कुठं रहायचं, कधी परत यायचं, याचही इशानने नियोजन केलं. वडिलांची इच्छा म्हणून ही यात्रा यशस्वी कशी ठरेल याचं बऱ्याच दिवसांपासून नियोजन केलं. हे कुटुंब 5 ऑगस्ट रोजी मुंबईहून निघालं . 7 ऑगस्टला वाराणसीत पोहोचलं. लक्सा इंथ पोहोचल्यानंतर इशान आणि त्याच्या आई-वडिलांनी होमस्टेमध्ये मुक्कामही केला. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर गंगा आरती केली. विविध घाटांनाही भेट दिली. सगळं सुरळीत चालू होतं. नियोजनाप्रमाणेच होत होतं. पण रायगडमधून काशीला गेलेल्या या कुटुंबासोबत असं काही घडलं की फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जातेय.
उत्तर प्रदेशातील वाराणसी हे पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. देशभरातून हजारो भाविक या शहरात दररोज दाखल होतात. महाराष्ट्रातूनही वाराणसी येथे जाणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सर्वसाधारण कुटुंबापासून ते अतिश्रीमंत घरातील व्यक्तीपर्यंत सगळेच वाराणसीत जाऊन देवाचे दर्शन घेतात. परंतु वाराणसीमध्ये यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील अशाच एका उद्योजकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रायगड येथील 56 वर्षीय व्यावसायिकाची वाराणसीमध्ये असताना अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर समोर अशी परिस्थिती निर्माण झाली की या कुटुंबाचं सगळंच उद्ध्वस्त झालं. पोलीस या प्रकरणांचा तपास करत आहेत.
विशाल हे दीर्घकाळापासून गंभीर आजारांनी त्रस्त
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडहून काशीमध्ये देवदर्सनासाठी गेलेल्या विशाल मुखर्जी यांचा मृत्यू झाला. ते आपली पत्नी जया मुखर्जी (51) आणि मुलगा ईशान मुखर्जी (26) यांच्यासोबत काशीला गेले होते. विशाल हे दीर्घकाळापासून गंभीर आजारांनी त्रस्त होते. मुंबई, दिल्ली आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नव्हती.
अन् डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
पुढे 9 ऑगस्टच्या रात्री विशाल यांची प्रकृती अचानक खालावली. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने हरिश्चंद्र घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते खोलीबाहेर आलेच नाहीत
अंत्यसंस्कारानंतर जया आणि ईशान हॉटेलमध्ये परतले. त्यानंतर ते खोलीबाहेर आलेच नाहीत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तशी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी खोली उघडली असता दोघेही मृतावस्थेत आढळले.
प्राथमिक तपासात खोलीत अॅल्युमिनियम फॉस्फाइडचे अंश आढळल्याचे सांगण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. विशाल यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.