बराच वेळ झाला परत आले नाही… अचानक नदीजवळ जमली मोठी गर्दी… कारण समजताच सर्वच हादरले

महाराष्ट्रासाठी शनिवार घातवार ठरला, एकाच दिवशी नदी, बंधारा आणि तलावात बुडून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक, पंढरपूर आणि भंडाऱ्यात या घटना घडल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा सुरक्षिततेच्या अभावामुळे हे जीव गेले. यात महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे, ज्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त होत असून जलसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बराच वेळ झाला परत आले नाही... अचानक नदीजवळ जमली मोठी गर्दी... कारण समजताच सर्वच हादरले
Image Credit source: TV9
| Updated on: May 17, 2026 | 1:40 PM

महाराष्ट्रासाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला. शनिवारी विविध ठिकाणी नदी, बंधारा आणि तलावात बुडून सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला आणि पुरुषांचाही समावेश आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या सातही जणांचे प्राण गेले आहेत. नाशिक, पंढरपूर आणि भंडाऱ्यात या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या सातही जणांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी अकस्मिक मृत्यू म्हणून या घटनांची नोंद केली आहे.

नाशिकच्या सिन्नर जवळील नांदूरशिंगोटे येथे बंधाऱ्यात बुडून महिला आणि तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदूरशिंगोटे येथील नागरेवस्ती बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मनीषा विजयराम जोशी (२८), मुलगा कार्तिक (११) आणि भाचे आदित्य (७) आणि अविनाश शिंदे (८) या यवतमाळ जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा अंत झाला आहे. यवतमाळहून पुण्याकडे कामानिमित्त निघालेल्या या कुटुंबाने नांदूरशिंगोटे परिसरात तात्पुरता मुक्काम केला होता. बराच वेळ चौघेही न परतल्याने शोध घेतला असता बंधाऱ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले. वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू

उजनी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे उन्हाळ्यातही चंद्रभागा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने पंढरपुरात दर्शनासाठी आलेल्या एका वयोवृद्ध भाविकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडून वित्तल गोडसे या भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उजनी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी असून अनेक ठिकाणी खोल खड्डे आणि वेगवान प्रवाह निर्माण झाला आहे. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या महिनाभरात चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे नदीकाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रशासनाने तातडीने नदी परिसरात रेस्क्यू टीम नियुक्त करावी, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावेत तसेच भाविकांना सतर्क करण्यासाठी पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तैनात कराव्यात अशी मागणी केली आहे.

बॅक वॉटरमध्ये बुडून दोघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे काल सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली. वैनगंगा नदीच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस तसेच महसूल विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच नदी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृत मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास व आवश्यक कायदेशीर कारवाई मोहाडी पोलीसांकडून करण्यात येत आहे.

 

Follow Us