Maharashtra Flood : पूरग्रस्तांना फडणवीस सरकारच्या काळातील जीआरप्रमाणेच मदत दिली जाणार – विजय वडेट्टीवार

| Updated on: Jul 26, 2021 | 2:25 PM

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

Maharashtra Flood : पूरग्रस्तांना फडणवीस सरकारच्या काळातील जीआरप्रमाणेच मदत दिली जाणार - विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार, पूरग्रस्तांना मदत
Follow us on

सांगली : राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने आणि भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांसह पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांकडूनही तसं आश्वासन देण्यात आलं आहे. अशावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 2019च्या जीआर प्रमाणे पूरग्रस्तांना मदत दिली जाणार अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते. 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. (Flood relief will be provided as per 2019 GR, Information from Vijay Wadettiwar)

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची अजित पवारांकडून पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. भिलवडीमध्ये बोटीच्या माध्यमातून त्यांनी पूरग्रस्त भागातील स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यानंतर सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जयंत पाटील, विश्वजित कदम, विजय वडेट्टीवार उपस्थित आहेत.

पुणे-बंगळुरु हायवे जड वाहनांसाठी खुला

तुफान पावसाने बंद झालेली वाहतूक आता हळूहळू सुरु होत आहे. पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद होती. अखेर या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहने पुढे सोडण्यात आली. तर तिकडे कोकणात मुंबई-गोवा महामार्गावरील खचलेला ब्रिटिशकालीन पुन्हा भराव टाकून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. चिपळूण येथील बहादूर शेख नाक्याजवळ वाशिष्टी नदीवरील खचलेल्या पुलावर भराव टाकून पूल दुरुस्थ करण्यात आला.

रायगड, रत्नागिरीसाठी 2 कोटी, अन्य जिल्ह्यांना 50 लाखाचा तात्काळ निधी

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी तत्काळ मदत म्हणून प्रत्येकी 2 कोटी आणि इतर जिल्ह्यांसाठी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती भूजबळ यांनी दिली. तसंच अलमट्टी धरणातून साडे तीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही धोका कायम आहे. मदतकार्य करणारी पथकं तैनात आहेत. त्यात राज्य आपत्ती व्यवस्थान विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, विविध संस्थांचा समावेश आहे, असं अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

Taliye Death name List : अखेर पाच दिवसानंतर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबलं, मृतांची संपूर्ण यादी

शाळेला जातो का?, जेवण मिळते का?; अजित पवारांकडून पूरग्रस्तांची विचारपूस

Flood relief will be provided as per 2019 GR, Information from Vijay Wadettiwar