Ashish Shelar : पंतप्रधान मोदी यांनी आवाहन करताच मंत्री आशिष शेलार यांच्या खात्याकडून झटपट तीन महत्वाचे निर्णय
Ashish Shelar : "विविध खतांची पोती जगात 3 हजाराला विकली जात आहेत, तेव्हा आपण 300 रुपयांना देत आहोत. पुरवठा साखळीत अडचण न येता आपण गोष्टी करत आहोत" असं आशिष शेलार राहुल गांधींच्या टीकेवर बोलताना म्हणाले.

मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना आवाहन केलं. “पेट्रोल आणि डिझेलचा वापर नियंत्रित केला पाहिजे. ज्या शहरात मेट्रो मार्ग आहेत, तिथे मेट्रोने प्रवास केला पाहिजे. जर आपण कार वापरतो, तर कार पूल सेवेचा वापर केला पाहिजे. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहनं आहेत, त्यांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांच्या या आवाहनाला माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “पंतप्रधानांच्या काही अपेक्षा आहेत. आमच्या विभागाकडून कान्सला जाऊ नये याचा निर्णय घेतला आहे. वाहनांचा वापर फक्त ईव्हीचा करावा. उद्यापासून आमच्या विभागाच्या बैठका ऑनलाइन होतील” या तीन निर्णयांची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
“युद्धाची परिस्थिती आणि सप्लाय चेन यात पडणारा व्यत्यय आणि आयात माल यावर मर्यादा घातल्या पाहिजेत.चलनावर होणाऱ्या परिणामाला संतुलित केलं पाहिजे. देशहिताचे हे कार्य आहे” असं आशिष शेलार म्हणाले. “जगात पुरवठा साखळी खंडित झाली आहे. अशात पावलं उचलणं गरजेचं आहे. आपल्याला अडचण आली की कमी-जास्त करतो. बाहेर फिरायला जाताना कमी जाऊ. देश हे आपलं कुटुंब आहे” असं आशिष शेलार म्हणाले.
परकियांनी लुटण्याचा प्रयत्न केला
“आज आपण पाहिलं सोमनाथ स्वाभिमान पर्व सुरु झालं आहे. स्वाभिमानाच्या दर्शनाचे पर्व आहे. परकियांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण हिंदुस्तान मंदिर वाचवण्यासाठी संघर्ष करत राहिला. जनतेनं स्वत: सहभागीता देऊन मंदिर उभं केलं. हे मंदिर आपल्या स्वाभिमानाचे रुप आहे. अशात ह्या पर्वाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूजा अर्चना करुन स्वत: केली. शौर्याचे प्रदर्शन आपल्या सेनेनं तिथे केलं. धाकलेश्वर मंदिर इथे मुंबईत हा कार्यक्रम आयोजित केला याचे समाधान आहे” असं मंत्री आशिष शेलार म्हणाले.
जगात 3 हजाराला आपण 300 रुपयांना देतोय
पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याच्या, वर्षभर सोनं खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर राहुल गांधी यांनी टीका केली. हे मोदींचं अपयश आहे असं राहुल गांधी म्हणाले. त्यावर आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. “राहुल गांधी यांच्या अज्ञानाचे हे पुरावे आहेत. अज्ञानातून टीका होत असेल तर काय बोलायचं?.सातत्याने देश प्रगती करत असताना पोटदुखी दिसत आहे. तेच असं बोलत आहेत” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.