मुंबई: ग्रामीण राजकारणाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchyat results 2021) सोमवारी निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले . या निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झाले होते. आज या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. यानिमित्ताने ग्रामीण राजकारणात वर्चस्व राखून असलेल्या महाविकासआघाडी आणि भाजपमधील प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Devendra Fadnavis and Mahavikas Aghadi leaders power test)
या निवडणुकीत मराठवाड्यातील ग्रामपंचायतींचा निकाल सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मराठवाड्यात ग्रामपंचायतींची संख्याही जास्त आहे. त्याचबरोबर याठिकाणी अनेक नावाजलेल्या ग्रामपंचायतीही आहेत.
पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजारमध्ये आजवर नेहमी बिनविरोध निवडणूक झाली होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच याठिकाणी निकालासाठी प्रत्यक्ष मतदान घ्यावे लागले. तर अण्णा हजारे यांच्यामुळे वलय प्राप्त झालेल्या राळेगणसिद्धीत काय होणार, याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, कर्जत- जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार आणि भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या गटाकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यातील राजकारणामध्ये नागपूर जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात कोणाला कौल मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नागपूर हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा होमपीच आहे. तर महाविकासआघाडीतील नितीन राऊत, सुनील केदार आणि अनिल देशमुख या तीन प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे.
कोकणातील 360 ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ते भाजपला रोखू शकणार का, हे पाहावे लागेल. तर दापोली पट्ट्यात शिवसेनेचे योगेश कदम आपले वर्चस्व टिकवून ठेवणार का, हे पाहावे लागेल.
संबंधित बातम्या:
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
(Devendra Fadnavis and Mahavikas Aghadi leaders power test)