…यांना चाप लावा, पुन्हा असं धाडस होता कामा नये; कोल्हापुरातील तणावावरून संभाजीराजे आक्रमक

| Updated on: Jun 08, 2023 | 1:28 PM

Sambhajiraje Chhatrapati on Clashes in Maharashtra over social media posts on Aurangzeb : कोल्हापुरात 'त्या' स्टेटसवरून तणाव; संभाजीराजेंची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले...

...यांना चाप लावा, पुन्हा असं धाडस होता कामा नये; कोल्हापुरातील तणावावरून संभाजीराजे आक्रमक
Follow us on

कोल्हापूर : औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूर शहरात एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अशात संभाजीराजे छत्रपती यांनी या सगळ्या प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे म्हणतात…

शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे, असं म्हणत संभाजीराजे यांनी इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

कोल्हापूरातील राड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे. अशी घटना घडवणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही. कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

औरंगजेबाचा दाखला देत सोशल मीडियावरील पोस्ट करण्यात आली. यावर आक्षेप घेण्यात आला. काल हिंदुत्वावादी संघटनांनी कोल्हापुरात मोर्चा काढला. पण या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी मोर्चावर प्रचंड लाठीमार केला. त्यामुळे जमाव आक्रमक झाला. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या अन् जमाव पांगवला. पण तरी आंदोलक मोर्चावर ठाम असल्यानं पोलिसांनी जमावाला चोप दिला. त्यानंतर धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

त्यानंतर अफवा पसरू नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आता कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, तरीही खबरदाराची उपाय म्हणून आजही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

संवेदनशील भागातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांची अधिक कुमक घटनास्थळी बोलावण्यात आली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, कोल्हापुरात परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापुरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. कालच्या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला आहे. या राड्या प्रकरणी आतापर्यंत 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.