
गेल्या काही महिन्यांपासून महायुतीतील मंत्र्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. त्यात आमदार संजय गायकवाड यांनी शिळे आणि खराब अन्नपदार्थ दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकले. यावरुन या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपालांना थेट महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांची यादी देण्यात आली.
ठाकरे गटातील काही नेते आज सकाळी ११.३० च्या राजभवनात गेले. यावेळी त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून महायुतीतील कलंकित मंत्र्यांचे राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट वादग्रस्त नेत्यांची यादी जाहीर केली.
“राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावे जर डान्सबार असेल आणि तो डान्सबार आईच्या नावे चालवला जात असेल, ज्यावर आतापर्यंत तीनदा रेड पडलेली आहे, असा माणूस गृहमंत्रीपदावर कसा राहू शकेल. एकीकडे आर आर पाटील यांनी गृहमंत्री असताना डान्सबार बंद केले होते आणि आता हे नवे गृहराज्यमंत्री ज्यांच्या आईच्या नाव डान्सबार आहेत. तर अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. माणिकराव कोकाटेंसारख्या मंत्र्यांनी ज्या प्रकराची असंवेदनशील वक्तव्य केली, हे अत्यंत वाईट आहे. त्याबद्दलही चर्चा झाली. अत्यंत बेशिस्त, बेताल आणि उर्मटपणे बोलणं असणारे संजय शिरसाट या मंत्र्यांचा पायउतार होणं गरजेचे आहे. याही मुद्द्यावर चर्चा झाली. योगेश कदम, संजय शिरसाट यांसह इतर लोकांशी संबंधित अनेक कागदपत्र आणि पुरावे त्यासोबतच पेन ड्राईव्हची फार मोठी फाईल अनिल परब यांनी राज्यपालांना दिली”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
“मंत्री नितेश राणे, संदीपान भुमरे यांचीही तक्रार केलेली आहे. संजय गायकवाड मारहाण प्रकरण, त्यासोबत विधीमंडळात गँगवॉरप्रमाणे झालेले मारहाण प्रकरणी विधीमंडळीची अप्रतिष्ठा होते. त्यामुळे अशा लोकांना समज द्यावी किंवा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलावं, याबद्दल राज्यपालांनी आम्हाला हो म्हणून सांगितलं. निश्चितपणे महाराष्ट्राची गौरव गरिमा राखणे हे माझेही कर्तव्य आहे. मी याबद्दल मुख्यमंत्र्यांशी या सर्व प्रकरणावर चर्चा करेल, असे राज्यपाल म्हणाले”, अशी माहिती सुषमा अंधारेंनी दिली.
यानंतर सुषमा अंधारे यांनी राज्यपालांना दिलेल्या यादीबद्दलची माहिती दिली. या यादीत पहिल्या क्रमांकावर योगेश कदम, दुसऱ्या क्रमांकावर गिरीश महाजन, तिसऱ्या क्रमांकावर संजय शिरसाट, चौथ्या क्रमांकावर माणिकराव कोकाटे, पाचव्या क्रमांकावर संदीपान भूमरे आणि सहाव्या क्रमांकावर नितेश राणे यांचे नाव आहे. आम्ही या अनुक्रमाने यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.