
राज्यातील विविध महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये भाजप आणि महायुतीचे सर्वाधिक महापौर निवडून आल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या ८ महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये आज महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. यात सोलापूर, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुका अखेर बिनविरोध झाल्या. तर नागपूर आणि धुळ्यात भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला. तर जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. जळगाव महापालिकेच्या १७ व्या महापौर म्हणून दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारला.
नागपूरमध्ये भाजपच्या नीता ठाकरे यांनी १०४ मते मिळवत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर दुसरीकडे, धुळे महापालिकेत तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी ५० मते मिळवून महापौरपदी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटाच्या संयुक्त उमेदवाराला केवळ १३ मते मिळाली.
नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला. नांदेडमधील ८१ पैकी ४५ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौरपदासाठी कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर उपमहापौरपदासाठी दिपकसिंह रावत यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
| शहर | महापौर (पक्ष) | उपमहापौर (पक्ष) |
| सोलापूर | विनायक कोंड्याल (भाजप) | प्रक्रिया सुरू |
| जळगाव | दीपमाला काळे (भाजप) | मनोज चौधरी (शिवसेना-शिंदे) |
| अहिल्यानगर | ज्योती गाडे (राष्ट्रवादी-AP) | धनंजय जाधव (भाजप) |
| नागपूर | नीता ठाकरे (भाजप) | लीला हाथीबेड |
| धुळे | मायादेवी परदेशी (भाजप) | ज्योत्स्ना पाटील |
| नाशिक | हीमगौरी आडके (भाजप) | विलास शिंदे (शिवसेना-शिंदे) |
| संभाजीनगर | समीर राजूरकर (भाजप) | राजेंद्र जंजाळ (शिवसेना-शिंदे) |
| पिंपरी चिंचवड | प्रक्रिया सुरू | शर्मिला बाबर (भाजप) |
| कोल्हापूर | रुपाराणी निकम |
दरम्यान या निवडींनंतर आता राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. नवनियुक्त महापौरांनी आपापल्या शहरांच्या विकासाचा संकल्प सोडला आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यामुळे राजकीय सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासकीय कामांना गती देणे, रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावणे यालाच आमचे प्राधान्य असेल, असा विश्वास सर्व नवनियुक्त महापौरांनी व्यक्त केला. या विजयामुळे स्थानिक पातळीवर भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.