Maharashtra News LIVE : मंत्रालयातील वीज पुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाल्याचा प्रकार
TCS प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याची माहीती समोर आली आहे. तर दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाची झालेली दुरवस्था, तुटफूट आणि परिसरातील अस्वच्छता यावरून मुंबई महापालिका सभागृहात जोरदार गदारोळ झाला. यासह राज्यातील, देश-विदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग..

TCS प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याची माहीती समोर आली आहे. निदाने पीडितेच्या घरी जात धार्मिक शिक्षण देणं, निदाच्या धर्माची प्रार्थना करणं, तिच्या धर्माचा पोशाख पीडितेला परिधान करायला लावणं… धार्मिक विधी आणि शिक्षणातून पिढतेचं मत परिवर्तन केल्याचं देखील कळत आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सुरु आहे. तर दुसरीकडे, आयटी कंपनी कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी निदा खानला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. निदाच्या पोलीस कोठडीत आज वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर कंपनीतील पीडितेवर बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात निदा खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाची झालेली दुरवस्था, तुटफूट आणि परिसरातील अस्वच्छता यावरून मुंबई महापालिका सभागृहात जोरदार गदारोळ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसने स्मारकाच्या तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरणाची मागणी करत प्रशासनावर टीका केली. भाजपनेही या मागणीला पाठिंबा दिला, मात्र स्मारकाची उपेक्षा काँग्रेसच्या काळातच झाल्याचा आरोप करत विरोधकांवर निशाणा साधला. यासह राज्यातील, देश-विदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग..
LIVE NEWS & UPDATES
-
विकास लवांडे यांच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये धडक मोर्चा
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत-महंतांबद्दल कथित बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले आहे. समस्त संत, ह.भ.प. महाराज आणि भजनी मंडळांनी यात सहभाग घेतला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा धडकणार असून वारकरी बांधव टाळ-मृदंगासह या आंदोलनात सहभागी झाले असून विकास लवांडे यांना तात्काळ अटक करण्याची प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केले आहे.
-
मंत्रालयातील वीज पुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाल्याचा प्रकार
संपूर्ण राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ३ वाजून ३० मिनिटांनी खंडित झालेला वीजपुरवठा ३ वाजून ४० मिनिटांनी झाला सुरळीत झाला आहे. तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. वीज गेल्याने अनेक कार्यालयात आणि मंत्र्यांच्या केबिन अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
-
-
मुंबईच्या मालवणी आणि मनोरी भागात ड्रग्जचे साहित्य जप्त, १३ आरोपींना अटक
मुंबईच्या मालवणी आणि मनोरी भागात ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणात १३ आरोपींना अटक केली आहे.
मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ ने अंमली पदार्थांच्या विरोधात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. नयानगर येथील एका कारवाईतून सुरू झालेला तपासाचा धागा थेट मुंबईतील ड्रग्ज निर्मितीच्या प्रयोगशाळेपर्यंत पोहोचला असून, पोलिसांनी तब्बल १३ कोटी ६५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. -
एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराला लावण्यात आलेल्या नोटीसीचा आजचा तिसरा दिवस
एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराला लावण्यात आलेल्या नोटीसीचा आजचा तिसरा दिवस आहे. या नोटीसीला नगरसेवक मतीन पटेल काय उत्तर देणार यावरच पुढील कारवाईचे चित्र स्पष्ट होणार आहे. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील सूत्रधार निदा खान हीला आश्रय दिल्याचा पटेल यांच्यावर आरोप आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास महापौर आणि उपमहापौर यांनी दिला कारवाईचा इशारा दिला आहे.
-
नाशिक – निदा खानला आज कोर्टात हजर करणार
नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणात आज दोन महत्वाच्या सुनावणी होणार आहेत. निदा खान हिची पोलीस कोठडी आज संपणार असल्याने तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर दुसरी सुनावणी TCS कंपनीतील संशयित आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे त्याबाबत होणार आहे.
-
परळी – बाळाच्या गर्भात मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल
परळीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा गर्भात मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यांची समिती स्थापन केली. ही समिती परळीत दाखल झाली. समितीच्या सदस्याने गित्ते हॉस्पिटल येथे भेट दिली. यावेळी आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून यानंतर ही चौकशी समिती या प्रकरणाचा अहवाल सादर करणार आहे. यानंतरच संबंधित डॉक्टरवर कारवाई केली जाणार की नाही ते स्पष्ट होणार आहे.
-
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात उष्णतेची तीव्र लाट
मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सकाळपासूनच कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
-
अमरावती – तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांचा एल्गार
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला आहे. हरभरा-तूर खरेदी आणि पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाफेडची खरेदी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून तिवसा तहसील कार्यालयात आक्रमक निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने हरभरा खरेदीसाठी 29 मे आणि तूर खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली असताना तिवसा तालुक्यातील खरेदी केंद्र का बंद आहेत? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनाला सराफ व्यापाऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी आवाहन केले असले तरी त्यांनी सराफ व्यापाऱ्यांचा विचार केला नाही. यामुळे सोने व्यापारातील पहिला फटका कामगारांना बसेल. सोने व्यापारी वर्षभर सोना नाही विकले तरी जगू शकतात मात्र कारागिरांनी कसे जगायचे. पंतप्रधानांचे हे अपयश आहे कारण गेल्या दहा वर्षात ते पंतप्रधान आहेत. दहा वर्षात ते व्यापारात सक्षम होऊ शकले नाहीत का? सोने म्हणजे ऐनवेळी मदतीला येणार दागिना आहे त्यामुळे लोक सोने खरेदी करणे बंद करणार नाहीत.
-
आधी नोटबंदी, मग लॉकडाऊन आणि आता ‘हे आवाहन; सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सराफ व्यावसायिक पुन्हा संकटात
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि गगनाला भिडलेले सोन्याचे दर यामुळे आधीच ग्राहक सोन्याकडे पाठ फिरवत होते. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याने पुण्याच्या राजगुरुनगर मध्ये सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
-
मोदींनी आवाहन करणे म्हणजे देशावर इंधन संकट येत की काय? वाहनधारकांच्या मनात शंका
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका वेगवेगळ्या अंगानं पाहायला मिळत आहे मध्यंतरीच्या काळात इंधन टंचाईचे देखील संकट निर्माण झालं होतं. अशातच पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर छत्रपती संभाजी नगर शहरातल्या पेट्रोल पंपावर दुचाकी आणि 4 चाकी वाहनधारकांनी मात्र इंधन भरण्यासाठी गर्दी केली असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्याचं पहायला मिळालं, मोदींनी अचानक आवाहन करणं म्हणजे देशावर इंधन संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत असं वाहनधारकांनी म्हटले. शिवाय मी तीनशे रुपयांचं पेट्रोल भरणार होतो मात्र आता सहाशे रुपयांचा भरून घेतो अशी देखील प्रतिक्रिया इंधन भरत असलेल्या एका दुचाकी वाहनधारकांनी दिली.
-
धुळे शहराचा जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढला
धुळे शहराचा तापमानाचा पारा 43 अंशाच्या पुढे पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली होती.. पुन्हा एकदा तापमान वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट दिसत आहे. अजून काही दिवसांनी तापमान वाढण्याची शक्यता असून काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे.
-
पावसाळ्यात ‘मोबाईल पंप’चा आधार, पाणी उपसासाठी पालिकेची तयारी
पावसाळ्यात ‘मोबाईल पंप’चा आधार, पाणी उपसासाठी पालिकेची तयारी. मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणी मोबाईल पंप तैनात करण्यात येणार. 7 झोनमध्ये प्रत्येकी एक मोबाईल पंप उपलब्ध असणार. प्रत्येक पंपाची ताशी 250 क्युबिक मीटर पाणी उपसा करण्याची क्षमता. मुंबईत 130 नवीन फ्लडिंग पॉईंट; एकूण संख्या 561 वर
-
देवस्थान इनाम जमिनींबाबत सरकारचा मोठा निर्णय
देवस्थान इनाम जमिनींबाबत सरकारचा मोठा निर्णय. जमिनी पुजारी, वहिवाटदार तसेच मिरासदार यांच्या मालकीच्या करण्याचा निर्णय. साडेचार लाख हेक्टरहून अधिक देवस्थान इनाम जमिनी वहिवाटदारांच्या नावे होणार. राजे-महाराजांच्या काळातील इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देवदेवता, मठ, मंदिरांच्या नावाने मोठ्या प्रमाणात इनाम जमिनी. तर देवस्थानच्या अधिकाराला कुठेही धक्का लागणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत
-
रत्नागिरीत वादळी पावसामुळे महावितरणालाही मोठा फटका
रत्नागिरीत वादळी पावसामुळे महावितरणालाही मोठा फटका. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल. 1 लाख 11 हजार 485 ग्राहकांना मोठा फटका. 85 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत, तर 26 हजार ग्राहक अद्याप अंधारात
-
नागपूर महानगरपालिका मुख्यालयात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन
नागपूर महानगरपालिका मुख्यालयात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. आपली बसच्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नसल्याने आंदोलन. शिवसेना नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन.
-
जळगावात सोन्या चांदीच्या दरात घसरण
जळगावात सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपये. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 66 हजार 770 रुपयांवर.
-
शेतकरी ॲसिड हल्ल्यात पोलीस मित्रच निघाला मुख्य आरोपी
शेतकरी ॲसिड हल्ल्यात पोलीस मित्रच निघाला मुख्य आरोपी. संशय टाळण्यासाठी आरोपीने दुसऱ्याच्या नावाने लिहिली होती चिठ्ठी. तपासादरम्यान पोलिसांसोबत राहूनच करत होता दिशाभूल. शेतकरी भाऊसाहेब बोर्डे दाम्पत्यावर झोपेत असताना केला होता ॲसिड हल्ला. नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे घटनेने उडाली होती खळबळ. शेतीच्या जुन्या वादातून चांगदेव मोरेने कट रचल्याचे उघडकीस.
-
नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा विक्रमी कहर
नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा विक्रमी कहर. आज तापमानाचा पारा ४५.५° सेल्सिअस वर गेला. अनेक वर्षांचे उष्णतेचे विक्रम मोडले. २०२२ मध्ये ४५.८°, तर १९५५ मध्ये ४६.१° तापमानाची नोंद. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये प्रशासन आवाहन. उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यात विशेष कक्ष सुरु.
-
जळगावात मे हिटचा तडाखा
जळगावात मे हिटचा तडाखा. तापमानाचा पारा पोहोचला ४४.५ अंशावर. यंदाच्या हंगामात मे महिन्याच्या सुरुवातीला ४४.५ इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद. आता पुन्हा तापमानाचा पारा एकदम वाढल्याने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही. सकाळी 8 वाजल्यापासून उन्हाचे चटके, रात्रीही रस्त्यावर फिरताना गरम झळा जाणवत आहेत. प्रचंड तापमानामुळे दुपारी वर्दळीचे रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा 45 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने पुढच्या दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता. उष्णतेत प्रचंड वाढ झाल्यामुळे, उकाडाच्या त्रासामुळे जळगावकर हैराण झाले आहेत.
-
ट्रॅव्हल्स जिहाद विरोधात रस्ता रोको आंदोलन
अहिल्यानगर येथे ट्रॅव्हल्स जिहाद विरोधात रस्ता रोको आंदोलन. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन. नगर-पुणे महामार्गावर कायनेटिक चौक येथे रस्ता रोको आंदोलन. आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. लव जिहाद, आयटी जिहाद, लँड जिहाद, स्कूल जिहाद कोचिंग जिहाद, डिलिव्हरी जिहाद, फ्रुट जिहाद, व्होट जिहाद, नंतर आता ट्रॅव्हल्स जिहादचा दावा. हिंदू महिलांची ट्रॅव्हल्स मध्ये मुस्लिम चालक आणि वाहकाकडून छेडछाड होत असल्याचा आरोप.
-
जळगावातील वाघूर धरणातील पाणीसाठ्यात १५ टक्क्यांनी घट
वाढत्या तापमानाचा फटका जळगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या वाघूर धरणाला बसला असून, गेल्या अडीच महिन्यांत पाणीसाठ्यात १५ टक्क्यांनी घट झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला ८६ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा आता ७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही १५ टक्क्यांनी वाढला असून मे महिन्यात यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे धरणात अजूनही पुरेसा पाणीसाठा असून, जळगाव शहराला पुढील तीन वर्षे पुरेल इतके पाणी उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी दिली आहे.
-
पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर, पण कारागिरांच्या पोटाचा प्रश्न विसरु नका’; सोने व्यापारी संतापले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्यातरी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर ज्वेलरी क्षेत्रातून उमटलेल्या प्रतिक्रियेवर कुमार जैन यांनी संवाद साधला. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या किमतींमुळे पंतप्रधानांनी देशहितासाठी हे विधान केले असले, तरी यामुळे ज्वेलरी क्षेत्रातील ३ कोटी कारागिरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गुंतवणूक म्हणून सोने खरेदी टाळली तरी चालेल, मात्र लग्नसराईसाठी दागिने बनवण्यास हरकत नसावी, जेणेकरून कारागिरांची रोजीरोटी सुरू राहील, अशी मध्यममार्गी भूमिका त्यांनी मांडली आहे.
-
सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीला 75 वर्षे पूर्ण; मुंबईत भाजपचा विशेष सोहळा, पंतप्रधान मोदी साधणार संवाद
सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, यानिमित्ताने सोमनाथ मंदिराच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा दिला जाणार आहे.
-
गोंदियात अवकाळीचा हाहाकार; वाऱ्यासह पावसामुळे आंबा बागांचे अतोनात नुकसान
गोंदिया जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपले असून, वादळी वाऱ्यामुळे देवरी तालुक्यातील बागायतदार संकटात सापडले आहेत. विशेषतः भागी गावातील एका शेतकऱ्याच्या सुमारे १०० आंब्यांच्या झाडांना या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. काढणीला आलेला आंबा जमिनीवर पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी हीटवेव्हचा तडाखा; पारा 35 अंशांवर
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट कायम असून सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार गेला आहे. उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना आजही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने ठाणे जिल्हा वगळता मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये संध्याकाळच्या वेळी पावसाची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
-
दामिनी पथकाची धाडसी कारवाई; छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात पोलीस नियंत्रण कक्षाला मिळालेल्या एका निनावी फोनमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य सावरले आहे. कमळापूर फाटा येथे १६ वर्षीय मुलीचा २२ वर्षीय तरुणाशी बालविवाह लावून दिला जात असल्याची माहिती मिळताच ‘दामिनी पथकाने’ तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान मुलीचे वय लग्नासाठी कायदेशीररीत्या अपात्र असल्याचे सिद्ध झाल्याने पोलिसांनी हा विवाह सोहळा थांबवला. या प्रकरणी संबंधित कुटुंबीयांना समज देण्यात आली असून, त्यांना १२ मे रोजी बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
महिला डॉक्टर विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
माजलगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन चुलत भावाच्या अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या भोळसर मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुलीला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या तिच्या वडिलांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर गर्भपात करणाऱ्या फुलेनगर येथील महिला डॉक्टर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेपूर्वी डॉक्टर महिलेचा अचानक रक्तदाब वाढल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कोणत्याही क्षणी त्या महिला डॉक्टरला अटक केली जाऊ शकते.
-
इराण अमेरिका युद्धाची झळ भारतीयांना बसणार..
पेट्रोल डिझेलच्या दरात २५ रुपयांची वाढ होणार असल्याची माहीती. आठवड्याला २ ते ३ रुपये दर लिटरमागे वाढणार … पेट्रोल डीजेल महागण्याची दाट शक्यता. पेट्रोलियम मिनिस्ट्रीला दर महा ५० हजार कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याची माहिती. हे नुकसान जास्त काळ भारताची अर्थव्यवस्था सोसू शकणार नाही , त्यामुळे ही दरवाढ याच आठवड्यापासून लागू होण्याची दाट शक्यता …
-
नगरपालिकेत दादागिरी, मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी
बीड नगरपरिषदेत थेट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून दोन जणांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सुरू असलेल्या मालमत्ता वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं माहिती आहे. फुकट पगार घेताय का? आमचं काम तात्काळ करा, असं म्हणत संबंधितांनी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या अंगावर धावून जात गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शेख निजाम अमीन आणि शेख इम्रान निजाम यांच्याविरोधात पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
-
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे भीषण आग
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील 8 ते 10 दुकाने या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
नाशिक मध्ये सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबाच लांब रांगा
दोन ते तीन किलोमीटर पर्यंत सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा. एकीकडे सीएनजीचा तुटवडा दुसरीकडे सीएनजीचे वाढलेल्या दरमुळे वाहन चालक त्रस्त. तीन ते चार तासापेक्षा अधिक काळ रांगेत थांबून वाहनात भरावा लागतोय सीएनजी. शहरातील अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचे फलक. पूर्णवेळ सीएनजी असलेल्या पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
-
ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा कायम; बीड, जालना ‘झेडपी’बाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गाला देण्यात आलेल्या २७ टक्के राजकीय आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. या प्रलंबित कायदेशीर पेचामुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे भवितव्य सध्या अंधाधुंद आणि अधांतरी सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर, बीड आणि जालना या दोन जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे आणि विशेषतः स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागून राहिले असून, न्यायालयाच्या निर्णयावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.
-
एमडीएस विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणात प्राध्यापकांना अटकपूर्व जामीन
दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडीएस) २४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक डॉ. कुलविंदर बंगा यांना अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिले आहे. विद्यार्थिनीचा जातीय आधारावर छळ केला किंवा आत्महत्येस प्रवृत्त केले, असे दर्शविणारा ठोस पुरावा तपास अहवालात आढळत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
-
हुतात्मा चौकातील स्मारकाच्या दुरवस्थेवरून महापालिका सभागृहात गोंधळ
दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाची झालेली दुरवस्था, तुटफूट आणि परिसरातील अस्वच्छता यावरून मुंबई महापालिका सभागृहात जोरदार गदारोळ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसने स्मारकाच्या तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरणाची मागणी करत प्रशासनावर टीका केली. भाजपनेही या मागणीला पाठिंबा दिला, मात्र स्मारकाची उपेक्षा काँग्रेसच्या काळातच झाल्याचा आरोप करत विरोधकांवर निशाणा साधला. शुक्रवारी झालेल्या सभागृह बैठकीत शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. “हुतात्म्यांच्या स्मारकाची अवस्था अत्यंत खराब झाली असून महापालिका प्रशासनाला हुतात्म्यांचा विसर पडला आहे का?” असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनीही प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका केली.
-
पावसाळी आजारांवर नियंत्रणासाठी महापालिकेची तयारी; रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची व्यवस्था
पावसाळा जवळ येत असल्याने कीटकजन्य आणि पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक तयारी सुरू केली आहे. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. महापालिकेने शहरातील रुग्णालयांमध्ये किमान ५०० ते १,७०० खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य विभागाकडून डास नियंत्रण, स्वच्छता मोहीम आणि जनजागृती अभियानावर विशेष भर दिला जाणार आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी एडिस डासांच्या प्रजननस्थळांचा शोध घेऊन ती नष्ट करण्यासाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
-
धाराशिव येथील दहा कोटीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या
धाराशिव येथील दहा कोटींच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ओडिशासाच्या नक्षलग्रस्त भागातून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नळदुर्ग येथील दहा कोटी 38 लाख किमतीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणात प्रसेनजीत खिरमहन दास मुख्य आरोपी आहे. ओडिसाच्या जनतापाई नक्षलभागातून अटक, यापूर्वी नाशिक आणि मालेगावातून दोन आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस नाकेबंदी दरम्यान रस्त्यावरच हशीश ऑइलच्या बॅगा फेकून आरोपी पसार झाला होता.
-
TCS प्रकरणातील निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत
निदाच्या मोबाईल मधून अनेक रहस्य बाहेर आल्यास तपासाला मदत होणार. तपास यंत्रणेंकडून निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. डिलीट केलेले मेसेज व्हिडिओ, नंबर पुन्हा रिकव्हर झाल्यास अनेक बाबींचा उलगडा होणार. निदाची फरार काळातील लोकेशन हिस्ट्री, बँक व्यवहार ऑनलाइन पेमेंट , क्लाऊड बॅकअप ई-मेल आणि सोशल मीडिया लॉगिन्स सर्व बाबींची चौकशी होणार आहे. आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून देखील कुठून फंडिंग होत होतं का याचा देखील तपास होणार…
-
पेड दर्शन घोटाळा प्रकरण; संशयिताची जामिनासाठी धाव
याआधी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यासह इतर दोघांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात कमी कालावधीत दर्शन देण्याच्या नावाखाली भाविकांकडून तीन ते १२ हजार रुपये घेणाऱ्या टोळीतील पाच जणांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यात मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगसह त्यांचे पुतणे ओम कडलग व अभिषेक कडलग आणि एजंट गोटीराम पेहरे व मध्यस्थ वसंत मुर्तडक यांचा समावेश आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता मात्र , न्यायालयाने एकाच सशर्त तीन दिवसांचा जामीन मंजूर करीत इतरांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
-
गरोदरपणामुळे नियुक्ती रोखणे अयोग्य; केंद्र सरकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द
एखादी महिला गर्भवती असणे हा कोणताही आजार नसून, केवळ गर्भधारणेच्या कारणावरून तिची नियुक्ती रोखणे हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केंद्र सरकारचा आदेश रद्द केला आहे. याचिकाकर्त्या डॉ. रेणुका शिवाजी बुगणे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजे CRPF मध्ये “स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर” पदावर निवड झाली होती.
-
आई तुळजाभवानीच्या खजिन्यात दोन वर्षात 28 किलो 408 ग्रॅम सोने आणि 523 किलो चांदीची भर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तिजोरीत गेल्या दोन वर्षात तब्बल 28 किलो सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडलीय.देशभरातून येणारे भाविक तुळजाभवानीला श्रद्धेने सोने चांदी आणि रोख रक्कम दान करतात.भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीतून तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत श्री. तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये तब्बल 253 किलो सोनं आणि 4523 किलो चांदी असल्याची नोंद आहे.
-
सासरच्या व अमाणूष मारहणीत गर्भवती महिलेचा गर्भपात; निष्पाप जीवाचा जन्माआधीच मृत्यू…
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील धक्कादायक घटना पती, नणंद ,सासूविरुद्ध पथ्रोट स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मारहाण आणि छड केल्याचा आरोप आहे. मारहाण झाल्यानंतर महिला दवाखान्यात नेण्यासाठी गयावया करत होती, मात्र पतीने तिला दवाखान्यात नेण्यासाठीही नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.