Maharashtra News LIVE : रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता?

टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे, राज्यात मलेरियाचं संकट डोकं वर काढत आहे. अशात देश, विदेशातील, राज्य, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग...

Maharashtra News LIVE : रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता?
| Edited By: | Updated on: Apr 27, 2026 | 11:11 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Apr 2026 11:10 AM (IST)

    रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता?

    रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता आहे.  आज परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची 12.30 वाजता विविध संघटनांसोबत मंत्रालयात चौथ्या मजल्यावर होणार बैठक होणार असून या मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे.  या बैठकीत किमान तीन ते सहा महिन्यांचा कालावधी टॅक्सी रिक्षा चालकांना देण्यावर संघटनांचा भर आहे.  शिवसेना नेते संजय निरूपम यांची फोनवरून प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 27 Apr 2026 11:04 AM (IST)

    संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज सत्कार

    संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज सत्कार होणार,  दादरच्या शिवतीर्थ निवासस्थानी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार.

    दहिसर मध्ये मराठी सक्ती वरून शिंदेंची शिवसेना आणि मनसे आमने-सामने आली होती, तेव्हा मनसैनिकांनी संजय निरुपम यांची गाडीची हवा काढत ते त्यांना भिडले होते.

  • 27 Apr 2026 10:55 AM (IST)

    ठाण्यात मनसेच्या वतीने गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात बॅनरबाजी

    ठाण्यात मनसेच्या वतीने गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. सदावर्ते यांचं नामकरण करत सदा रडते असं केलंय. मराठी सक्तीचा विरोध करणाऱ्या संघटनेचा मनसेकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. मनसेचे पदाधिकारी स्वप्निल महिंद्रकर यांच्या वतीने ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी बॅनर लावण्यात आला.

  • 27 Apr 2026 10:45 AM (IST)

    मराठी सक्तीवरून परवाना रद्द करण्याच्या निर्णयावर माझा आक्षेप कायम- संजय निरुपम

    मराठी भाषा येत नसल्यास रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा. या भूमिकेवर मी ठाम आहे. परवाना रद्द केल्यास चालकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. राज्यात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. परंतु परवाना रद्द करणारा निर्णय हा दुष्परिणाम निर्माण करणारा आहे. परवाना रद्द करण्याच्या निर्णयावर माझा आक्षेप कायम आहे, असं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं.

  • 27 Apr 2026 10:35 AM (IST)

    मतं सांभाळा, कारण कुणीच कुणाचं नाहीये. सगळे पैशांसाठी आहेत; राऊतांचा शिंदेंना टोला

    “विधान परिषदेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे भूमिका मांडतील. एकनाथ शिंदे महान आहेत, ते भाजपचीही मतं फोडू शकतात. मतं सांभाळा, कारण कुणीच कुणाचं नाहीये. सगळे पैशांसाठी आहेत,” असं वक्तव्य राऊतांनी केलंय.

  • 27 Apr 2026 10:25 AM (IST)

    4 मे रोजी धारावीकर अदानींच्या कार्यालयावर धडकणार

    सर्व पात्र-अपात्र झोपडपट्टीवासीयांना धारावीतच ५०० चौरस फुटाची घरे देण्यात यावी, कोणत्याही झोपडपट्टीवासीयाचे धारावीबाहेर पुनर्वसन करण्यात येऊ नये आदी प्रमुख मागण्यांसाठी धारावीकर ४ मे रोजी सकाळी ११ वाजता अदानी कंपनीच्या माटुंगा येथील कार्यालयावर धडकणार आहेत.

  • 27 Apr 2026 10:15 AM (IST)

    न्यायमूर्ती स्वर्णा कांतांकडून न्याय मिळण्याची माझी आशा धुळीस मिळाली- केजरीवाल

    अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्ती स्वर्णा कांता यांना पत्र लिहिलं आहे. केजरीवाल प्रत्यक्षपणे किंवा वकिलांमार्फत उपस्थित राहणार नाहीत. “न्यायमूर्ती स्वर्णा कांतांकडून न्याय मिळण्याची माझी आशा धुळीस मिळाली. मी गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्ग अनुसरण्याचं ठरवलंय”, असं केजरीवाल म्हणाले.

  • 27 Apr 2026 10:11 AM (IST)

    इराणमध्ये खामेनींची हत्या झाली, त्याबद्दल मोदींना काहीच चिंता नाही- राऊत

    “अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होताच आपल्या पंतप्रधानांना हिंसाचाराची चिंता होते. परंतु इराणमध्ये खामेनींची हत्या झाली, त्याबद्दल त्यांना काहीच चिंता नाही. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, मणिपूरमध्ये लोक मारले जात आहेत, त्याबद्दल त्यांना चिंता वाटत नाही. गाझामध्ये हजारो लहान मुलं मारली गेली, त्यावर मोदींनी कधीच शोक व्यक्त केला नाही,” अशी टीका संजय राऊतांनी मोदींवर केली.

  • 27 Apr 2026 10:07 AM (IST)

    जिथे निवडणुका होतात, तिथेच मोदी, अमित शाह जातात- संजय राऊत

    “निवडणूक जिंकण्यासाठी, राजकारण करण्यासाठी, मतदारांवर दबाव आणण्यासाठी तुम्ही राज्यातून सशस्त्र दल, पॅरामिलिट्री फोर्स पश्चिम बंगालला घेऊन जातात. पण जिथे नागरिक मारले जात आहेत, काश्मीरमध्ये, मणिपूरमध्ये तिथे तुम्ही का पाठवत नाहीत? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. तुम्ही मणिपूरमध्ये जाऊन बघा, तिथे काय होतंय, तिथेही रॅली काढा”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  • 27 Apr 2026 09:55 AM (IST)

    वाशिमच्या मालेगावमध्ये एका 30 वार्षिय महिलेची हत्या, धक्कादायक घटना

    अकोला फाटा पोस्ट ऑफिससमोर घडली घटना. हत्तेचं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेनंतर परिसरात खळबळ.. पोलिसांची तत्पर कारवाई. संशयित आरोपी ताब्यात, चौकशी सुरू…

  • 27 Apr 2026 09:50 AM (IST)

    अमरावतीच्या तापमानाचा पारा 46.8° वर

    अमरावतीच्या तापमानाचा पारा 46.8° वर तापमानाने मागील सात वर्षाचा रेकॉर्ड मोडला. वाढलेल्या तापमानामुळे अमरावती जिल्ह्यातील 42 तलाव पडले कोरडे… अनेक मोठ्या जलाशयातील पाणी पातळी झपाट्याने खालावली. तापमानात मोठी वाढ झाल्याने बाष्पीभवन होत आहे त्यामुळे तलावातील पाणी पातळी मध्ये झपाट्याने कमी होत आहे.

  • 27 Apr 2026 09:40 AM (IST)

    जळगाव शहरातील मानराज पार्क चौफुलीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वराला चिरडले

    या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ओम सुनील गिरी असे 25 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी मयत तरुणाच्या आईसह बहिणीचा मोठा आक्रोश. अपघातामुळे काही वेळासाठी दुतर्फ वाहतूक काही काळासाठी विस्कळीत. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

     

  • 27 Apr 2026 09:30 AM (IST)

    मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा भागात मनसे कडून अनोखा उपक्रम

    परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मनसे कडून मराठी पुस्तकाचा वाटप. 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं आणि समजणं यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मराठी सक्ती करण्यात आली आहे.मराठी सक्ती होणार असल्यामुळे काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये भीतीच्या वातावरण पसरला आहे. काही रिक्षा आणि टॅक्सी चालक मुंबई शहरात दहा ते पंधरा वर्षांपासून राहतात मात्र या परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही. अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना शिकण्यासाठी सात दिवसांसाठी मनसे कडून मराठी पुस्तक वाटून अल्टिमेटम देण्यात आला आहे

  • 27 Apr 2026 09:21 AM (IST)

    भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर..

    चार दिवसाची पोलीस कोठडी आज संपणार. संगमनेर पोलीस न्यायालयात हजर करण्याची हि तिसरी वेळ. भोंदू गडगे 9 दिवसांपासून पोलिस कोठडीत. मंत्र तत्राने कॅन्सर तसेच दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गडगे झालाय गजाआड. अंनिसच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड. आज पुन्हा गडगेला न्यायालयात करणार हजर. पोलीस आज आणखी वाढीव कोठडी मागणार. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन? याकडे लक्ष…

  • 27 Apr 2026 09:15 AM (IST)

    आजपासून राज्यभरातील कृषी केंद्र चालकांचा बेमुदत बंदला सुरुवात

    राज्यातील सर्व 85 हजार कृषी सेवा केंद्र तर जळगाव जिल्ह्यातील साडे तीन हजार कृषी केंद्र चालक बंद मध्ये सहभागी. जळगावातील मार्केट मधील कृषी केंद्र व बियाण्यांची विक्री करणारे दुकान बंद असल्याचा पाहायला मिळत आहे. अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विक्री थांबवावी, खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘लिंकिंग’ पद्धती बंद करावी. नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्याच्या जाचक अटी रद्द करावेत या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी कृषी केंद्र चालक आक्रमक. कृषी केंद्र बेमुदत बंद असल्यामुळे बियाणे तसेच कीटकनाशकांचे विक्री ठप्प होणार असून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे

  • 27 Apr 2026 08:57 AM (IST)

    नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य उमेदवारीला शिवसनेच्या काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध

    स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पक्षाकडे मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या विषयावर अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू असून, सर्व मतांचा विचार करून उमेदवारी निश्चित केली जाईल अशी देखील माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षनिष्ठा आणि स्थानिक जनसंपर्क लक्षात घेऊन उमेदवार निवडणे गरजेचे आहे. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तर दुसरीकडे, नीलम गोऱ्हे यांच्या समर्थकांनी त्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक कामगिरीचा उल्लेख करत उमेदवारीसाठी त्या योग्य असल्याचा दावा केलाय.

  • 27 Apr 2026 08:45 AM (IST)

    अंबड तालुक्यातल्या कुक्कडगाव येथे गळफास घेऊन 44 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

    जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील कुक्कडगाव येथे ज्ञानेश्वर गायकवाड या 44 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली, सध्या शेतातील ज्वारी काढण्याचा हंगाम सुरू असून घरातील सर्वजण सकाळीच शेतात निघून गेले होते, त्यामुळे घरात कोणी नसल्याचे पाहून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी घरातल्या अँगलला वायरच्या सहाय्याने गळफास घेतलाय. ज्ञानेश्वर गायकवाड हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना केवळ नव गुंठे जमीन आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि काही खाजगी सावकारांचा देखील कर्ज असल्याची माहिती समोर आली त्यामुळे याच विवंचनेत मागच्या काही दिवसापासून ते नेहमी नैराश्यात आणि चिंतेत असायचे. त्यामुळे याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय, दरम्यान या घटने प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • 27 Apr 2026 08:30 AM (IST)

    नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान ४१.४ अंशांवर

    नाशिक शहरात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे,  तापमान ४१.४ अंशांवर पोहोचला आहे.  यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला असून उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडले असून नागरिकांनी बाहेर पडणे टाळले आहे.  सलग १०-१२ दिवसांपासून तापमान ३९ अंशांच्या पुढे आहे. रात्रीही उकाडा कायम आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 27 Apr 2026 08:25 AM (IST)

    बदनापूर शहरातल्या कॅनरा बँकेतील अपहार प्रकरणी आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार

    जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून बँक घोटाळा प्रकरणाची मालिका सुरू आहे, अशातच बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारत जवळपास सात कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेला बँक मॅनेजर विजेंद्र पाटणकर आणि सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे या दोघांची आज पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे, बँक अधिकारी संजय डोंगरे हा फरार असल्यामुळे पोलिसांकडून सखोल तपास करण्यासाठी या आरोपींची वाढीव पोलीस कोठडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या अपहर प्रकरणात बदनापूर पोलिसांकडून सध्या चारही बाजूने सखोल तपास करण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 27 Apr 2026 08:25 AM (IST)

    लासलगाव सह परिसरात चोरांचा सुळसुळाट

    कोयता हातात घेऊन चोरीसाठी आलेला चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जायचं की नाही या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे. गाव भागासह कॉलनीमध्ये पोलीसग्रस्त वाढवण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

  • 27 Apr 2026 08:20 AM (IST)

    गुंतवणुकीच्या आमिषाने सैन्याच्या जवानाची २२ लाखांची फसवणूक

    नाशिक येथे गुंतवणुकीच्या आमिषाने सैन्याच्या जवानाची २२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. एसआयपीच्या नावाखाली आरोपीने विश्वास संपादन करून कागदपत्रे घेतली. फिर्यादीच्या नावावर बँकेत कर्ज काढून रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली आहे. प्रकार जून २०२५ मध्ये घडला असून एप्रिल २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

     

  • 27 Apr 2026 08:15 AM (IST)

    नाशिक विमानतळावरील प्रवासीसंख्येत २४ टक्क्यांची मोठी वाढ

    नाशिक विमानतळावरील प्रवासीसंख्येत २४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. २०२५-२६ मध्ये ४.२१ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. कार्गो निर्यातीत तिप्पट वाढ, ४७० टनांपर्यंत झेप घेण्यात आली आहे. मार्च महिन्यातच ४० हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, गोवा, हैदराबादसाठी सेवा उपलब्ध आहेत.

     

  • 27 Apr 2026 08:10 AM (IST)

    बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य यांनी केला मनमुराद डान्स

    बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य यांनी मनमुराद डान्स केला . ‘मै हूं डॉन’ गाण्यावर सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसलेंच्या गाण्यावर त्यांनी ठेका धरला . बार्शीतील भगवंत महोत्सवावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी ठेका धरला. मागील सात दिवसापासून बार्शीचे ग्रामदैवत प्रकटदिनानिमित्त भगवंत महोत्सवात सुरु आहे.

     

  • 27 Apr 2026 08:06 AM (IST)

    मेळघाटात कुपोषणाचे सावट कायम वर्षभरात 92 बालके आणि 5 मातांचा मृत्यू…..

    मेळघाटात कुपोषणाचे सावट कायम असून वर्षभरात 92 बालके आणि 5 मातांचा मृत्यू झाला आहे. मेळघाटात आरोग्य सुविधांचा अभाव कायम असून मेळघाटातील बालमृत्यूवर यापूर्वीच न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या एका वर्षात बालकांच्या मृत्यूची हादरवनारी आकडेवारी समोर आली आहे. एका महिन्याच्या आतील तब्बल साठ बालकांचा मेळघाटात मृत्यू झाला आहे.

टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार असून गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतर प्रयत्नाचे निदा खानवर हिच्यावर गंभीर आरोप आहेत. तर दुसरीकडे मेट्रो 5 च्या विस्तारासाठी 18 हजार 130 कोटींच्या निधीला मंजूरी देण्यात आली असून कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरपर्यंत होणार मेट्रोचा विस्तार होणार आहे. तर राज्यात मलेरियाच्या रुग्णांची देखील वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षी मलेरियाच्या एकूण 23 हजार 247 रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 27 रुग्णांचा मृत्यू झालातर, एकट्या मुंबईत 10 हजार 162 रुग्ण सापडले असून, 7 रुग्ण मृत पावले आहेत… अशात देश, विदेशातील, राज्य, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…

Follow Us