IMD Rain Update : पाऊस आला रे… या 6 जिल्ह्यांना खुशखबर, वाचा हवामानाचा ताजा अंदाज!
Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारलेली आहे. असं असलं तरी आता आगामी काही दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भात सरासरीपेक्षा 70 टक्क्यांहून अधिक पावसाची तूट निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही तूट सध्या तरी पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, येत्या 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्यता असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विदर्भातील 6 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट
नागपूर हवामान विभागाने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी 2 ते 5 सप्टेंबर या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 4 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, त्या दिवशी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण घटले
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात यंदाच्या ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. अनेक भागांत पावसाअभावी शेतीवरील संकट अधिक गडद झाले असून पिकांना पाण्याची गरज भासत आहे. पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. आगामी काही दिवसांत होणारा पाऊस ही तूट कितपत कमी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एल निनोचा फटका
दरम्यान, हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे एल निनोचा प्रभाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रभावाचा पावसावर परिणाम होत असून, पुढील काळात एल निनो आणखी मजबूत झाल्यास पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भात सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पाऊस होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे चित्र आहे.
संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण कमी
यंदा संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात 69% पावसाची तूट आहे तर विदर्भात 58% पाऊस कमी झाला तर राज्यातील सरासरी तूट ही 46% आहे. राज्यात सरासरी निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.