IMD Rain Update : शेतकऱ्यांची चिंता वाढली, हवामान विभागाचं मोठं भाकित, आता पाऊस….

सध्या शेतकरी पेरणी करण्यासाठी मोठ्या पावसाची वाट पाहात आहेत. असे असतानाच आता हवामान विभागाने मोठा अंदाज व्यक्त केला आहे.

IMD Rain Update : शेतकऱ्यांची चिंता वाढली, हवामान विभागाचं मोठं भाकित, आता पाऊस....
rain update
| Updated on: Jun 09, 2025 | 8:12 PM

Maharashra Rain Update : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. येणाऱ्या 48 तासांत म्हणजेच 9 आणि 10जून रोजी राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जना तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांत यलो अलर्ट

हवामान विभागाने घटामाथा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशीव आणि अहिल्यानगर यासहित 13 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील काही भागांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

नागपूरमध्ये गरमी वाढली, 12 जूननंतर पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. पण असे असले तरी येत्या 14 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार

हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार महाराष्ट्रातील काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आगामी आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागात 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाऊ शकते. पूर्व विदर्भात तर याहूनी जास्त पारा वर जाण्याची शक्यता आहे. सध्या मोठ्या शक्यता नसली तरी कोकण, मुंबई, पुण्यातील काही भागांत पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय.

पेरणी करण्यासाठी वाट पाहावी

राज्यातील शेतकरी पेरणी करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी काही दिवस थांबावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच 14 जूनपर्यंत राज्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही, असंही हवामान विभागाने म्हटलंय. त्यामुळे आता मोठ्या पावसाची वाट पाहात असलेल्या शेतकऱ्यांची एकाप्रकारे चिंता वाढली आहे. किनाऱ्यालगतचे जिल्हे वगळता अन्य भागात मोठी गरमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.