देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्रच सरस; मृत्यूदर आणि सक्रीय रुग्णांची संख्या कमी

| Updated on: Feb 07, 2021 | 8:40 PM

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्ण संख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. | Coronavirus

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्रच सरस; मृत्यूदर आणि सक्रीय रुग्णांची संख्या कमी
Follow us on

मुंबई: महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा (Covid 19) जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहेत असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. (Coronavirus patients in Maharashtra)

2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पाँडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 इतके पॉझिटिव्ह रुग्ण होते. या तुलनेत महाराष्ट्रात यादिवशी 16,008 रुग्ण होते. महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.

महाराष्ट्राच्या विविध प्रयत्नांमुळे कोरोना प्रतिबंधात यश

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्ण संख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचे आणि करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक आंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील केले आहे. अगदी यासंदर्भातील माहिती अद्ययावत करताना पूर्वीचे जे मृत्यू कोरोनामुळे झाले होते पण त्याची नोंद झाली नव्हती अशा सुमारे हजारभर मृत्यूची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली. इतर काही राज्यांनी तर कोरोनाने मृत्यू झालेल्या पण रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेले मृत्य हे कोरोना मृत्यू म्हणून नोंद केलेले नव्हते इतकेच नाही तर केवळ कोरोना आहे पण श्वसनाशी संबंधित लक्षणे नाहीत असे कोरोनाचे मृत्यू गृहीत धरले नव्हते.

एकूण मृत्यूंची सख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दश लक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 647, गोवामध्ये 527, पाँडेचरीत 522, आणि महाराष्ट्रात 403 मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दश लक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.

कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर 3 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढता दर होता 0.10% तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहा पट जास्त म्हणजे 0.61%, गोवा 0.2%, पंजाब 0.12%, गुजरात आणि छत्तीसगड 0.11% असा दर होता. सक्रीय रुग्णाबाबत महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्येत 290, रुग्ण असताना केरळमध्ये 2000 पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आज आहेत.

संबंधित बातम्या:

(Coronavirus patients in Maharashtra)