ओव्हरटेकचा नाद नडला, ट्रकच्या धडकेत एसटीचे दोन तुकडे, ड्रायव्हरची सीट तर…. 3 प्रवाशी जागीच ठार

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरू आहे. यवतमाळमध्ये एसटी बस-ट्रक धडकेत ३, तर लातूरमध्ये कार अपघातात २ असे एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. रत्नागिरीत बस दरीत कोसळली असली तरी प्रवासी सुखरूप बचावले.

ओव्हरटेकचा नाद नडला, ट्रकच्या धडकेत एसटीचे दोन तुकडे, ड्रायव्हरची सीट तर.... 3 प्रवाशी जागीच ठार
yavatmal accident
Updated on: Dec 05, 2025 | 8:35 AM

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात अपघातांची मालिका सुरू आहे. यवतमाळ, लातूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये झालेल्या तीन मोठ्या अपघातांमध्ये जीवित व वित्तहानी झाली आहे. यात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने काही अपघातात प्रवासी सुखरूप बचावले असले तरी, या तीन मोठ्या अपघातांमुळे राज्यात रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यवतमाळमध्ये ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळ रात्री ८ च्या सुमारास चंद्रपूर-यवतमाळ मार्गावर भीषण अपघात झाला. वणीहून करंजीकडे जाणाऱ्या एसटी बसला करंजीकडून वणीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की एसटी बसची ड्रायव्हरची बाजू अक्षरशः पूर्ण चिरडली गेली. तसेच बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले.

या भीषण अपघातात तीन प्रवाशी जागीच ठार झाले. तर १४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनी बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. तसेच सर्व जखमींना यवतमाळ, पांढरकवडा, मारेगाव आणि करंजी येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाचा ताबा घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

लातूरमध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर शहरा जवळ बायपास महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारने एकेरी मार्गावर पुढे असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. तसेच कारमधील दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या दोन मित्रांची नावे रविकुमार दराडे (२०) आणि सागर ससाणे (२१) अशी आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

रत्नागिरीत खासगी ट्रॅव्हल्स बसला अपघात

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातील एका चक्रीवळणावर मोठी दुर्घटना टळली. एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अपघात होऊन ती सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते. मात्र, दैव बलवत्तर म्हणून या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर तातडीने साखरपा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी घटनास्थळी साखरपा पोलीस दाखल झाले आहे. दरीत कोसळलेल्या बसला बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.