Weather update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला, या जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, मात्र तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे.

आज राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, मात्र दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. शुक्रवार आणि शनिवार असा दोन दिवस हवामान विभागाकडून विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीमध्ये काल तब्बल 47. 1 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
नागपुरात उन्हाचा कहर
नागपूर जिल्ह्यात आज हवामान विभागाकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपुरात उष्णता प्रचंड वाढली असून, त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. उष्मघाताच्या भितीनं दुपारच्या सुमारास नागपूर शहारातील वर्दळ 50 ते 60 टक्क्यांनी कमी झाली आहे.
गोंदियात 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अवकाळी पावसानंतर काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळाला. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा तापमानात मोठी वाढ झाली आहे. गोंदियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, अति उष्णतेमुळे एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
अकोला तापला
अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. आज पुन्हा एकदा 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच 2026 मध्ये 21 मे पर्यंत अकोला जिल्ह्यात उष्माघाताचे 83 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अकोल्यात दोन संशयित उष्माघाताच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तर पश्चिम विदर्भातील एकत्रित आकडेवारीनुसार आतापर्यंत 131 उष्माघाताचे रुग्ण नोंदवले गेले असून, 128 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन रुग्णांवर उपचार सुरू असून दोन संशयित उष्माघाताच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. श्याम श्रीकृष्ण इंगळे वय 30 वर्ष आणि रामेश्वर महादेव जांभळे वय 50 वर्ष अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.
अमरावती जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट
अमरावती जिल्ह्याला हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. दरम्यान उद्या देखील अमरावती शहरात अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. 23 तारखेपर्यंत अमरावती जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चि विदर्भातील उष्मघाताच्या रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी
अकोला : 83 रुग्ण | उपचार सुरू – 01 | डिस्चार्ज – 81 | मृत्यू – 02
वाशिम : 03 रुग्ण | उपचार सुरू – 00 | डिस्चार्ज – 03 | मृत्यू – 00
बुलडाणा : 18 रुग्ण | उपचार सुरू – 00 | डिस्चार्ज – 18 | मृत्यू – 00
यवतमाळ : 11 रुग्ण | उपचार सुरू – 00 | डिस्चार्ज – 11 | मृत्यू – 00
अमरावती : 16 रुग्ण | उपचार सुरू – 01 | डिस्चार्ज – 15 | मृत्यू – 00
एकूण : 131 रुग्ण | उपचार सुरू – 02 | डिस्चार्ज – 128 | मृत्यू – 02
मुंबईत काय स्थिती?
पुढील काही दिवस राज्यात तापमान चाळिशीपार राहण्याचा अंदाज आहे. रविवारपर्यंत मुंबईत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. २४ मे पर्यंत मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशांच्या आसपास राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्यानं मुंबईकरांना उकाड्याचा सामना कारवा लागत आहे.