Weather Forecast : काळजी घ्या दिवस वैऱ्याचा, या जिल्हयाला थेट रेड अलर्ट, IMD चा मोठा इशारा
राज्यात उन्हाचा कडका चांगलाच वाढला आहे, अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं आहे. पुढील काही दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार असून, तापमान आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात उन्हाचा कडका चांगलाच वाढला आहे, अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं आहे. याचा सर्वाधिक फटका हा विदर्भाला बसला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांचं तापमान सध्या 45 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढलं आहे. तीव्र उन्हात होरपळणाऱ्या विदर्भाला तूर्तास तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाहीये. पुढील पाच ते सात दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2013 साली नागपूरचे तापमान 47.9 अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते, यंदाही त्याच दिशेनं पारा पुढे सरकत आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
विदर्भात आलेल्या उष्णतेच्या लाटेनं भयंकर रूप धारण केल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुधवारी कमाल तापमानाने विक्रमी झेप घेतलेली होती. विदर्भामध्ये वर्धा हा सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे. वर्ध्यामध्ये ४७.१ अंश सेल्सिअस एवढं रेकॉर्ड ब्रेक तापमान नोंदवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे नागपूरकरांनी देखील या दशकातील ‘मे’ महिन्यातला सर्वात उष्ण दिवस अनुभवला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट तर तीन जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहान हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा
चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच चढला असून, नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत मोठा इशारा दिला आहे. जिल्ह्यात आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर शुक्रवार ते रविवार म्हणजेच २२ ते २४ मे या कालावधीत तीव्र उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ वर्तविण्यात आला आहे.
चंद्रपुरचे तापमान ४६.२ अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तत्काळ मार्गदर्शक सूचना जारी करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तीव्र उन्हाच्या काळात, विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळावे. तहान लागली नसली तरीही शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. हलके, पातळ, सच्छिद्र आणि पांढऱ्या रंगाचे सुती किंवा खादीचे कपडे वापरावे. प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवावे. लिंबूपाणी, ताक, लस्सी यासारख्या द्रवपदार्थांचे सेवन करावे. गरोदर महिला, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अकोल्याला रेड अलर्ट
अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा सतत वाढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतमजुरांनी काळजी घ्यावी असं आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.