मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता या तारखेला मतदान; निकाल कधी?

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली; आता या तारखेला मतदान; निकाल कधी?
zilla parishad election postponed
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 29, 2026 | 7:36 PM

Zilla Parishad Election Postponed : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

कोणकोणती प्रक्रिया पूर्ण झाली?

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल

मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील.

नवा निवडणूक कार्यक्रम काय आहे?

आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

दरम्यान, यावेळची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय दुखवटा असल्याने आता निवडणूक लांबवणीवर पडली आहे. त्यामुळे दुखवटा संपल्यानंतर पुन्हा एकदा प्रचार सुरू होईल. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.