
नगर परिषदा, महापालिकांनंतर आज जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. महाराष्ट्रात एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक झाली होती. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, सांगली, रायगड, लातूर, रत्नागिरी, धाराशिव, परभणी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी मतदान झालं होतं. आज निकाल जाहीर होत आहेत.
नगर परिषद, महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदांमध्येही भाजपचा बोलबाला आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार भाजप 7, एकनाथ शिंदे शिवसेना 2 आणि सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2 जिल्हा परिषदांमध्ये आघाडीवर आहे. पंचायत समितीमध्ये सुद्धा असच चित्र दिसतय. 125 पैकी 84 पंचायत समितीमध्ये भाजपनेच बहुतांश ठिकाणी आघाडी घेतली आहे. पंचायत समितीत भाजप 25, शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी सुनेत्रा पवार 18 ठिकाणी आघाडीवर आहे. नगर परिषदा, महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलाय.
पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी सुद्धा प्रचारात फार जोर लावला नाही. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. तिथे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळतय. अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बारामती येथे प्रचाराला चाललेले असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
शरद पवार, उद्धव ठाकरे गटाची काय स्थिती?
ग्रामीण भागात पक्ष विस्ताराच्या दृष्टीने या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका महत्वाच्या असतात. कारण तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रत्येक पक्षासाठी महत्वाची असते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे कुठेच काही फारस अस्तित्व दिसत नाहीय. मविआमध्ये फक्त काँग्रेसने काही जागांवर विजय मिळवलाय. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचा दारुण पराभव झालाय.