
Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Protest : मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आमरण उपोषणाच्या आंदोलनाला राज्य सरकारने आणखी एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे. सध्या जरांगे उपोषणस्थळी बसलेले आहेत. तर दुसरीकडे आझाद मैदानाचा परिसर, सीएसएमटी अशा महत्त्वाच्या भागात आंदोलक थांबलेले आहेत. काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच हा इशारा देताना त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या आगामी दिशेबद्दलही सांगितलं आहे. हे आंदोलन पुढे गेले तसेच मागण्या मान्य करण्यास विलंब लावला तर सरकारच्या अडचणी वाढतील, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर जरांगे यांनी त्यांच्यासोबत आंदोनलाला बसलेल्या मराठा समाजाशी संवाद साधला. यावेळी बोलताना मंगळवार, बुधवारनंतर आणखी खूप लोक मुंबईत येणार आहेत. सरकारने न ऐकल्यास हे लोक येणार आहेत. तुम्ही आंदोलनाला एका-एका दिवसाची मुदतवाढ देऊन काहीही उपयोग नाही. तुम्ही आमच्या मागण्यांच्या अंमलबजावणीला वेळ लावला तर मराठे मुंबईकडे येत राहणार आहेत, असं सांगितलं. तसेच मी खोटं बोलत नाही. आरक्षणाला जसा-जसा विलंब लागले तसे-तसे लोक काम सोडून मुंबईकडे येणार आहेत, असेही ते म्हणाले.
तुम्हाला आताच वेळ आहे. हा या आंदोलनाचा पहिला टप्पादेखील नाही. या आंदोलनाचे एकूण सात ते आठ टप्पे आहेत. आम्हाला माहिती होते की मुंबईत आम्हाला त्रास दिला जाणार आहे. म्हणूनच आम्ही सध्या फार कमी लोक मुंबईला आलो आहोत. आगामी दिवसांत आणखी लोक येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार. तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसतील. आम्ही आरक्षण घेणारच आहोत. आम्ही लोकशाहीचा मार्ग सोडणार नाहीत, असे म्हणत मराठा आरक्षणाचा लढा आगामी काळात अधिक तीव्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, पुढे बोलताना तुम्ही मला तुरुंगात टाका. मी तुरुंगातही उपोषण करणार आहे. मला गोळ्या घातल्या तरी मी त्या झेलणार आहे. मी सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी दिला. त्यामुळे आता जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार नेमके काय करणार? मराठा आरक्षणाविषयी निर्णय होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.