केंद्राकडे ‘त्या’ 15 जातींसोबत मराठ्यांची जात ओबीसीसाठी का पाठवली नाही? जरांगेंचा सवाल

महाराष्ट्रातील 15 जाती ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात याव्या, अशी शिफारस केंद्राकडे करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग ओबीसींच्या यादीत नव्या जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. पण या 15 जातींच्या यादीत मराठा समाजाचा समावेश नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सरकारला सवाल केला आहे.

केंद्राकडे त्या 15 जातींसोबत मराठ्यांची जात ओबीसीसाठी का पाठवली नाही? जरांगेंचा सवाल
मनोज जरांगे पाटील
Chetan Patil | Updated on: Oct 09, 2024 | 9:54 PM

महाराष्ट्र सरकारकडून 15 जातींना ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्यात यावं, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलं आली आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यामध्ये 15 जातींमध्ये बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार, भोयार, पवार, कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, रुकेकरी, लोध लोधा लोधी, डांगरी यांचा समावेश आहे. पण या जातींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल केला आहे. मराठ्यांची जात का नाही पाठवली? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. तसेच मराठ्यांशी दगा फटका करू नये, असादेखील इशारा जरांगे यांनी दिला.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील श्री क्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याला मनोज जरांगे हेलिकॉप्टरने येणार अशी चर्चा होती. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. “सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामुळे परवानगीचा काही विषय येणारच नव्हता. मेळाव्याला हेलिकॉप्टरने एन्ट्री करावी, अशी समाजाची मागणी आहे. समाज बांधवांच्या भावना होत्या, समाज बांधवांची हजारोंच्या संख्येने गडावर म्हणत होते, हेलिकॉप्टरने जायचं. मात्र आपण गरिबांचा लढा लढतो. आपले बांधव त्यात बसून अधिकारी होऊन आले पाहिजे. समाज मोठा करण्याच माझं स्वप्न आहे. मी भूषाणात जगणारा नाही. मोठेपणात वागणारा नाही. समाजाचं म्हणणं होतं की, गडावर गर्दी होणार आहे. गर्दीतून तुम्हाला येता येणार नाही. एकही हेलिकॉप्टर नको. ते मी रद्द केलं आहे”, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

दसरा मेळाव्याला परवानगी, जरांगे काय म्हणाले?

मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला अखेर परवानगी मिळाली आहे. पण यासाठी पोलिसांनी अनेक अटी ठेवल्या आहेत. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “ऐकायला मिळालं होतं की नाही म्हणून, पण एसपी साहेब आणि कलेक्टर साहेब चांगले आहेत. परवानगी तर मिळणारच होती, गोरगरिबांचा दसरा मेळावा आहे. मराठा बांधवांना विनंती आहे की, सगळ्यांनी शांतता राखायची आणि शांततेत जायचं आहे”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

“लोकांचा आकडा सांगता येणार नाही. पण 10 आले काय आणि 1000 आले काय, आणि लाख आले काय, तरी कार्यक्रम होणार आहे. मात्र लोक घरी थांबत नाही. बीड जिल्ह्यातील एकही माणूस घरी थांबणार नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष आहे. मनोज जरांगे या मेळाव्यात काही नवी घोषणा करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us