Manoj Jarange Patil : मुंबईत कुठे रहायचं? कुठे जायचं नाही? पोलिसांनी पकडू नये यासाठी काय ट्रिक वापरायची? जरांगेंकडून प्लान जाहीर, भगवं वादळ धडकणार
Manoj Jarange Patil : "जेलमध्ये जाणारे जे लोकं आहेत, ते इथे आले की संविधान बदलतं. मग तुम्ही 75 टक्के, 2000 कोटी कितीही घोटाळा करा, तुम्हाला जेल होणार नाही. दोन संविधान चालू आहेत" अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. “आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत कसं जायचं, कुठे रहायचं त्याचा प्लानही त्यांनी सांगितला. “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख संख्या होईल” असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. “12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14, 15, 16, 17, 20, 12 ते 20 सप्टेंबरपर्यंत परवानगी काढा. मुंबईत पाहुणे, मित्रमंडळींकडे रहा. आझाद मैदान, वर्षावर जाऊ नका” संशय येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“12 तारखेच्या दोन-चार दिवस अगोदर हळूहळू तुम्हाला पुढे जाता येईल. उगाच घोळ घालू नका. एकदा का 12 तारखेला दोन-चार दिवस राहिले की, हळूहळू मुंबईकडे जा. मित्राकडे रहा. पोलिसांनी नेलं तर खुशाल पोलीस स्टेशनला जा, टेन्शन घेऊ नका” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “पुढे जाताना गाडीला झेंडा बांधून जाऊ नका. झेंडा बांधून जायचं नाही. हळूहळू घुसा, दोन-चार दिवस आधी. पाच-सहातारखेपासून हळूहळू पुढे जा. सगळ्यांनी माझ्यासोबत येऊ नका. पोलिसांना त्रास द्यायचा नाही. एकनाथ शिंदे, फडणवीसांकडे बघायचय आपल्याला. पोलिसांना त्रास द्यायचा नाहीय.आलं का ध्यानात, उगाच टाइमपास करु नका. दोन-चार दिवस आधी मुंबईकडे निघा” असं आवाहन जरांगे पाटील यांनी समर्थकांना केलं.
कमीत कमी एक दोन लाख घरं आहेत
“मुंबईत आपले मराठे आहेत. दोन-तीन लाख घरात पाच-पाच पोरं राहिली तरी 20-25 लाख आधीच जमतील. नीट पत्ता घ्या. आझाद मैदानावर जाऊ नका, वर्षावर जाऊ नका. नाही तर त्यांना संशय येईल. डाव टाकायला शिका” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “कमीत कमी एक दोन लाख घरं आहेत. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पुण्यातले खूप लोक आहेत. दोन-तीन लाख माथाडी कामगार आपले आहेत. इथली दोन-चार दिवस गर्दी कमी झाली काही फरक पडत नाही. मुंबईत दोन-चार दिवस आधी जाऊन रहा. त्यांना फक्त त्रास देऊ नका” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.