मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय, निवडणुका असेपर्यंत…; मनोज जरांगेंचा सरकारवर मोठा आरोप

इंधन दरवाढ आणि तुटवड्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली असून, शेतकऱ्यांनी नांगरणी व पेरणी न करता मोदींच्या आवाहनाला साथ द्यावी, असा खोचक टोला लगावला आहे.

मी डोक्याला तेल लावणंही बंद केलंय, निवडणुका असेपर्यंत...; मनोज जरांगेंचा सरकारवर मोठा आरोप
manoj jarange
| Updated on: May 22, 2026 | 10:28 AM

सध्या देशभरात आणि राज्यात इंधनाच्या तुटवड्यामुळे आणि दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वांनी साथ दिली पाहिजे, शेतकऱ्यांनी आता शेती कोरडी पडली तरी चालेल पण पेरण्या आणि नांगरणी करू नये,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

सुख-दुःखाच्या प्रसंगाला जायचे असेल तर लोकांनी कसे जायचे?

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच सध्याच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांचे वास्तव मांडले. सध्या ग्रामीण भागात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सध्या ट्रॅक्टर शेतात उभा आहे आणि त्याचा मालक पेट्रोल पंपावर हातात कॅन घेऊन रांगेत उभा आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्या जर घरात एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, किंवा कुठे सुख-दुःखाच्या प्रसंगाला जायचे असेल तर लोकांनी कसे जायचे? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

 निवडणुका संपेपर्यंत गाड्या दणादण पळवल्या

सरकारने आता स्वतःच्या सोयीनुसार वागणे सुरू केले आहे. जोपर्यंत निवडणुका सुरू होत्या, तोपर्यंत यांनी प्रचारासाठी दणादण गाड्या पळवल्या. तेव्हा त्यांना पेट्रोल-डिझेल कमी पडले नाही आणि सर्व काही सुरळीत मिळत होते. पण निवडणुका संपताच सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मी डोक्याला तेल लावणेही बंद केले

यावेळी जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनांचा संदर्भ देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. “मोदींचे आवाहन खरोखरच अवघड आहे. मी त्यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. अगदी मी डोक्याला तेल लावणेही बंद केले आहे, कारण त्यांच्यामुळेच मी आता तेल वाचवा अशी मोहीम सुरू केली आहे. सरकारने या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सध्या राज्यात इंधन टंचाई आणि वाढत्या दरामांमुळे शेतीकामांना मोठा ब्रेक लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

Follow Us