जालना: औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती सुरु नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच आहे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे. (Congress leader Ashok Chavan on Aurangabad rename issue)
ते शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडली. औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
तसेच औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा आंदोलकांचा रोष दिसून आला. मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून शनिवारी औरंगाबादेत आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत तो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.
निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला.
संबंधित बातम्या:
काँग्रेस-शिवसेनेची नुरा कुस्तीच, निवडणुकीनंतर औरंगाबादचा ‘तो’ मुद्दा बाजूला पडेल: देवेंद्र फडणवीस
तर ठाकरे सरकारला धोका, निरुपम यांचा ‘औरंगाबाद’वर इशारा
औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील
(Congress leader Ashok Chavan on Aurangabad rename issue)