Manoj Jarange Patil : आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये?; मनोज जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांच्यासमोरच सवाल
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ३० मे पासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी भेटीत आंदोलन न करण्याची विनंती केली असतानाही, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मागील लाठीचार्जच्या घटनेवरून त्यांनी सरकार आणि प्रसाद लाड यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली, तसेच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असन 30 मेच्या तारखेची घोषणाही केली. मराठा समाज आणि मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्या मान्य न झाल्याने ते पुन्हा आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाबद्दल घोषणा केली. मात्र त्यापूर्वी अनेक मोठ्या घडामोडींना वेग आला असून भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज अंतरवली सराटीत पोहोचले. त्यांनी जरांगे यांच्याशी संवाद सआदत उपोषण न करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.
प्रसाद लाड यांच्याशी बोलताना मनोज जरांगे यांनी तीव्र शब्दांत नाराजी नोंदवली. मागील आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जवरूनही जरांगे यांनी खडेबोल सुनावले. “ तुमची आई खरंच आमची आई आहे, इतकी संस्कृती सोडलेले आम्ही लोकं नाहीयोत. पण ज्या दिवशी आमच्या आईला माराल,आम्ही त्यांच्या आईवर का बोलू नये ? ” असा खडा सवाल जरांगे यांनी विचारला.
म्हणून ते शब्द बोलले गेले..
” त्या दिवशी आमच्या माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या, तेव्हा आम्ही गप्प का बसावं? त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हता हो. तुमचीच आई आहे. मी तर उपोषणात होतो. उपोषणात कसेही शब्द जातील, पण उपोषणाच्या बाहेर असे शब्द वापरले असतील तर दाखवा. उपोषण ही अशी विचित्र चीज आहे की माणसाला काहीच दिसत नाही. इतकी भयंकर स्थिती आहे. त्यांना इतक मारलं, बरं पाणी पाजावं ना, पोलिसांना पण आई असेलच ना. गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्ताने मारलं होतं त्यांना. तुम्ही हे सहन करून दाखवला का ? “असा सवाल जरांगे यांनी विचारला. तिला मारलं, गोळ्या घातल्या, नाक तुटून गेलं, कान तुटून गेलं, अशा शब्दांत जरांगे यांनी त्या परिस्थितीचं वर्णन केलं.
आणि मुख्यमंत्री म्हणतात माझे पोलिस आहेत, माझ्या लोकांना मारलं. जनता तुमची नाही का ? असा सवाल विचारत , म्हणून ते शब्द बोलले गेले, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.
बातमी अपडेट होत आहे.