भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला; बड्या नेत्याला पुन्हा डावललं, नव्या वादाला तोंड फुटलं

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटल्याचे समोर येत आहे. धाराशिवमधील बड्या नेत्याला डावलल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला; बड्या नेत्याला पुन्हा डावललं, नव्या वादाला तोंड फुटलं
bjp flag news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 10:35 AM

धाराशिव भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना डावलल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राणा जगजितसिंह पाटील यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर येत आहे. या वादामुळे धाराशिवमधील दोन नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे.

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि विधानपरिषद आमदार बसवराज पाटील यांच्या गटांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आणि बॅनरवरून राणाजगजितसिंह पाटील यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर आता उमरगा तालुक्यातील मुरूम येथे आज शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री आरोग्य शिबिराच्या बॅनरवरही राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो आणि कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याचे समोर आलं आहे.

विशेष म्हणजे, बॅनरवर भाजपच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे फोटो असताना राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यात बॅनरवर राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो नसल्याने धाराशिवमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

मराठा समाजाचं राणा जगजितसिंह यांच्या घरासमोर आंदोलन

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याच्या आरोपावरून आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद धाराशिवमध्येही पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केलं. सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्याचबरोबर जरांगे यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून सरकार फसवणूक करत असल्याचाही आरोप आंदोलकांनी केलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us