Sanjay Raut: MPSC बाबत संजय राऊत यांची मोठी मागणी, एकच खळबळ, म्हणाले…
Sanjay Raut on MPSC: उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठी मागणी केली आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी संघ आणि भाजपवर कठोर शब्दात टीका केली.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत मोठी मागणी केली. वारंवार होणारी पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील घोटाळे समोर येत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरखास्त करा अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे. तर परीक्षेतील घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी गठीत सनदी अधिकाऱ्यांच्या समितीवरही त्यांनी तोंडसुख घेतले. अनेक घटनात्मक संस्थांचे संघीकरण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या निशाणावर मुख्यमंत्री, भाजप आणि संघ होता.
MPSC ची प्रतिष्ठा धुळीस मिळाली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्व आहे. महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकारी पुरवण्याचे काम, नेमण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा आयोग करते. आयोगाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया, परीक्षा प्रक्रिया होते. ती पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक असावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी आयोगाची स्थापना केली. आयोगाची स्थापना भाजपने नाही केली. अशावेळेला या संस्थांचं पावित्र्य जपण्याचे काम व्हायला हवे. पण गेल्या दहा वर्षात, विशेषतः फडणवीस जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री झाले. त्या प्रत्येक वेळेला आयोगाच्या माध्यमातून हजारो, लाखो विद्यार्थ्यांचा छळच झाला. कधी परीक्षेत घोटाळे, भरतीत घोटाळे झाले. त्या आयोगावर आपला माणूस आणून त्या माध्यमातून आपल्या माणसांना मदत व्हावी. ही भूमिका सर्वत्र भाजपची राहिलेली आहे. मग राम मंदिर ट्रस्ट असो, महाराष्ट्राचा लोकसेवा आयोग असो, नीट असो की युपीएससी असो, मेडिकल परिषदच नाही कोर्ट असो या प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांचा माणूस हवा आहे. यामुळे एमपीएससीची प्रतिष्ठा पार धुळीस मिळालेली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरखास्त करा
राहुल गांधी जे म्हणत आहेत की हजारो विद्यार्थी रस्त्यावर आहेत. ते सध्या रस्त्यावर आहेत. ते जर आयोगाच्या दिशेने चालायला लागले तर आयोगाला टाळे लागल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी हा लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे. राज्यपालांनी ते बरखास्त करावं कारण ती घटनात्मक संस्था आहे. भाजपला धार्जिणे असलेले भ्रष्ट अधिकारी या लोकसेवा आयोगावर नेमलेले आहे असा आरोपही त्यांनी केला.
संवैधानिक संस्थांचे भाजपीकरण
राज्यातील पेपरफुटीनंतर सरकारने ज्येष्ठ सात अधिकाऱ्यांची एक सुधारणा समिती गठीत केली आहे. ती समिती परीक्षा पद्धतीत अमुलाग्र बदल सुचवेल. त्यावर राऊतांनी अचूक निशाणा साधला. हे सात लोकं कोण आहेत असा सवाल करत ती सगळी भाजपचीच माणसं असल्याचा आरोप त्यांनी केला. राम मंदिर ट्रस्टचा सीईओ हा निवृत्ती एअर मार्शल होऊ शकतो. तर सनदी अधिकारी तर नाममात्र आहेत. ते सगळे भाजपचेच आहेत. सनदी अधिकाऱ्यांचं, न्याय व्यवस्थेचं संघीकरण झाले आहे, असं आपण म्हणतो. संवैधानिक संस्थांचे भाजपीकरण झाले आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
