मोठी बातमी! विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय? CM फडणवीसांनी दिल्लीतून दिली सर्वात मोठी अपडेट
राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. रोज अनेक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार नाही हे अद्याप समोर आलेलं नाही. यावर आता CM फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. रोज अनेक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार नाही हे अद्याप समोर आलेलं नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी काल सांगितलं, पुन्हा सांगतो, उद्या पुन्हा विचारू नका. आमचं जवळपास एकमत झालेलं आहे.’ पुढे मुख्यमंत्री काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘जागावाटपावर आमचं जवळपास एकमत झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली आहे. त्यामुळे या दोनच गोष्टींवर आमचं आडलं आहे, यावर आम्ही तोडगा काढू. आता कठीण पेपर संपलेला आहे, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचं आहे फक्त, त्यानंतर विषय संपतील.’
भाजपची 48 नावांची यादी दिल्ली दरबारी
गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजप 11 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जागांसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. अशातच आता एकूण 48 जणांच्या नावाची यादी घेऊन रवींद्र चव्हाण दिल्लीला गेले आहेत. ही यादी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली आहे. आता केंद्रीय नेतृत्व यावर चर्चा करून लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे.
अद्याप जागावाटप ठरलेले नाही
अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या फॉर्म्युलात भाजपने स्वतःकडे 11 जागा ठेवून शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गटाला 2 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र आता हा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने किमान 6 ते 7 जागांची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे अद्याप जागावाटप अंतिम होऊ शकलेले नाही.