8 दिवसात खड्डे बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात आणून बसवू, औरंगाबादेत मनसेचा इशारा, जळगाव रोडवर आंदोलन

| Updated on: Oct 06, 2021 | 4:34 PM

आठ दिवसांत हा व्हीआयपी रस्ता खड्डेमुक्त केला नाही, तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसविल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला.

8 दिवसात खड्डे बुजवा, अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात आणून बसवू, औरंगाबादेत मनसेचा इशारा, जळगाव रोडवर आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांनी जळगाव रोडवर रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आंदोलन केले.
Follow us on

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खड्ड्यांतून वाट काढत वाहन चालवताना चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसूतक नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी जळगाव रोडवरील सबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे बोथट संवेदनांचे पित्र पूजन आंदोलन केले.

आठ दिवसांची मुदत अन्यथा खड्ड्यात आणून बसवू!

स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या औरंगाबादेतील रस्त्यांची अशी अवस्था अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. तसेच महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हातात खड्ड्यांचे फलक दाखवून, हीच का तुमची स्मार्ट सिटी, असा सवाल करीत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आठ दिवसांत हा व्हीआयपी रस्ता खड्डेमुक्त केला नाही, तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसविल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला. या आंदोलनात सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, अब्दूल रशीद खान, अशोक पवार पाटील, संतोष कुटे, नंदू नावपुते, अभय मांजरामकर,,गणेश साळुंके ,संदीप दांडगे, मनोज भिंगारे, राजू चव्हाण, बाबुराव जाधव, रुपेश शिंदे, चेतन पाटील, विशाल इराळे पाटील, प्रवीण मोहिते, राहुल कुलकर्णी, रवी गायकवाड, नितीन इंचुरकर, प्रशांत जोशी,कृष्णा घायट पाटील आदिंनी सहभाग नोंदविला.

आंदोलनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

आंदोलक अचानक रास्ता रोको करण्याची शक्यता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलिस निरिक्षक संभाजी पवार, पोलीस निरीक्षक विनोद सलागरकर, कैलाश देशमाने, एपीआय श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, महादेव गायकवाड हे कर्मचाऱ्यांसह आंदोलनापूर्वी हजर होते.

गेल्या दोन दिवसात चार मृत्यू

गेल्या महिन्यापासून सतत होणारा पाऊस आणि जागोजागी साचलेले पाणी, रस्त्यावरील खड्डे मुळे औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. सोमवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना म्हणजे शिऊर बंगला येथून एक महिला तिच्या पतीसह उपचारासाठी औरंगाबादच्या दिशेने निघाली. मात्र रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. एवढा त्रास होऊनही जन्मलेले बाळ दगावले.
तर दुसऱ्या एका घटनेत भरधाव एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेने तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग कर्मांक 752 एच रस्त्यावरील खंडाळा शिवारातील जयेश पालेजा यांच्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता झाला. या अपघातात सोमनाथ निकम, कडुबा ठुबे, अमोल ठुबे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही तरुण वैजापूरहून त्यांच्या गावाकडे दुचाकीने परतत होते. खंडाळा गाव शिवारातील पालेजा यांच्या पेट्रोल पंपाजवळ समोरून वैजापूरच्या दिशेने औरंगाबा-नाशिक मार्गावर एसटीने दिलेल्या धडकेत हे तिघे जागीच ठार झाले.

इतर बातम्या- 

खड्ड्यांनी केला घात, औरंगाबादकडे येताना बसमध्येच प्रसूती, बाळ दगावले, दवाख्यान्यात न जाता महिला माघारी फिरली

हा आहे पुरोगामी महाराष्ट्र? जातपंचायतीच्या धसक्याने दाम्पत्याने घेतले विष, पतीचा मृत्यू, उस्मानाबादेत भीषण घटना