महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको; अमित यांच्या भूमिकेला राज ठाकरेंचा पाठिंबा, नेमकं काय म्हणाले?
अमित ठाकरे यांच्या भूमिकेला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. महापुरुषांच्या रांगेत मोदींचा फोटो नसावा, असे राज ठाकरेंनी सांगितले.

पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यावरून मोठा वाद झाला होता. अमित ठाकरे यांच्या आदेशानंतर एका मनसे कार्यकर्त्याने महापुरुषांच्या रांगेतून मोदींचा फोटा काढला होता. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल होता. यावरुन अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजपने आंदोलन देखील केले. आता अमित ठाकरे यांच्या भूमिकेला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला. महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, असे राज ठाकरेंनी अधोरेखित केले.
राष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी, ६ सप्टेंबर रोजी ठाण्यात पार पडला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या मेळाव्यातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अनेक राजकीय घडामोडींवर भूमिका स्पष्ट केल्या. यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातील कॉलेजमध्ये घडलेल्या भूमिकेवर भाष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले, आमच्या अविनाश जाधवने सर्वात चांगली दहीहंडी केली. नाच,गाणी केली नाही. जय जय महाराष्ट्राच्या तालेवर तरुण नाचत होते. बऱ्याच घटना घडल्या आहेत. काही घटनांवर सोशल मीडियावर भाष्य केलं. रोज लिहिण्यापेक्षा बोलणे बरे वाटते. बरेच विषय आहेत. पत्रकारांनी मला विचारलं. मी म्हटलं, ठाण्यात या. काही गोष्टीची सुरुवात करण्याआधी मध्यंतरी एक प्रकरण झालं. आमचा अमित पुण्याला गेला होता. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या फोटोवरून वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या रांगेत कोणी बसू शकत नाही’.
‘सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायला पाहिजे. कारण पंतप्रधान आहेत. बाकी मतभेद शंभर असतील. पण तो दुसऱ्या भिंतीवर… त्या रांगेत नको. सराकारी कार्यालय, शाळा असतील, त्यांनी ही गोष्टी पाळली पाहिजे. त्यांनी सर्व पाळले पाहिजे. कोर्ट, सरकारी अस्थापनामध्येही कळलं पाहिजे. त्यामुळे आता सुधारणा करा. मला काही धोके दिसत आहेत. तुम्हाला वेगळ्या गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाणीवपूर्वक केला जात आहे. केला जाणार. त्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं. देशात सर्वत्र धर्माची झिंग आली आहे. धर्मांचा अभिमान समजू शकतो. पण झिंग नाही. धर्माभिमानी असले पाहिजे. धर्मांध नव्हे. असं वातावरण तयार केलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवलं जात आहे. त्याच्यातून राग निर्माण केला जात आहे. जेणेकरून इतर गोष्टीवरून दुर्लक्ष व्हावं,असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.