MNS | मनसे पुन्हा आक्रमक, थेट टोलानाका फोडला, नेमकं कारण काय?

| Updated on: Aug 17, 2023 | 9:21 PM

MNS party workers Vandalized Rajapur Toll Plaza | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज चांगलेच आक्रमक झाले. मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांवरुन मनसे कार्यकर्त्यांनी आज राजापूर टोल नाक्यावर जोरदार तोडफोड केली. या तोडफोडीचे व्हिडीओ आता समोर आले आहेत.

MNS | मनसे पुन्हा आक्रमक, थेट टोलानाका फोडला, नेमकं कारण काय?
Follow us on

रत्नागिरी | 17 ऑगस्ट 2023 : मनसे कार्यकर्त्यांकडून राजापूर टोलनाक्यावर तोडफोड करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातून मनसे कार्यकर्त्यांनी राजापूर टोलनाक्यावर तोडफोड केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीदेखील मुंबई-गोवा महामार्गावर आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांची नुकतीच सभा पार पडली. त्या सभेत त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेल येथे काल जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर तयार व्हावा यासाठी आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर एक मोठं जनआंदोलन करण्यात यावं, असं आवाहन मनसैनिकांकडून करण्यात आलं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जनआंदोलने केली.

तोडफोड करणारे पोलिसांच्या ताब्यात

मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबई-गोवा महामार्गासाठी काल मानगावात एका कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आज मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या राजापूर टोल नाक्यावर तोडफोड करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता राजापूर टोलनाक्यावर तोडफोड केली. टोल फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी कोकणात जाहीर सभा पार पडली होती. या सभेत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवर टीका केली होती. त्यांनी रिफायनरी प्रकल्पावरुन कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला होता. मुंबई-गोवा महामार्ग नेमका कधी बनेल? असा सवाल त्यांनी केला होता. पण त्यानंतरही महामार्गाची अवस्था खराब आहे.

दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड करण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवासांपूर्वी अहमदनगरला एका टोल नाक्याची तोडफाड करण्यात आली होती. मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी टोल नाक्यावरुन लवकर सोडली नाही म्हणून कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली होती.  याशिवाय मनसेने काही वर्षांपूर्वी टोल नाक्याविरोधात जोरदार आंदोलन केलं होतं. त्यामुळे अनेक टोल नाके बंद झाले होते.