मोशी दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, अखेर 83 तासांनी बचावकार्य थांबवलं; शेवटच्या क्षणी कोण वाचलं? नावे आली समोर
moshi accident : मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. शेवटचा मृतदेह मध्यरात्री सापडल्यानंतर बचावकार्य थांबवण्यात आलं.

पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील मोशीत झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवसांनतर बचावकार्य थांबवण्यात आलं. या दुर्घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. तर काही जणांचा जीव वाचवण्यात बचावपथकाला यऱ आलं. मध्यरात्री 1 वाजता एकाचा मृतदेह सापडला. त्यानंतर 83 तासांनी प्रशासनाने बचाव कार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुर्घटनेच्या वेळी इमारतीत 22 जण होते. तर कचऱ्याजवळ एक जण होता, असे सर्व मिळून 23 जण कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. दुर्गघना घडल्यानंतर तातडीने बचावकार्याल सुरुवात करण्यात आली. सुरुवातीच्या काही तासांत 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. पहिल्या दिवशी 9 जणांना बाहेर काढण्यात आलं. दुसऱ्या दिवशी बचावकार्यासाठी सैन्य दल, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन मदतीला धावून आलं. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यांसाठी संयुक्त शोध मोहीम राबवली. मोशीत शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास वामन कसबे ही व्यक्ती शोध मोहिमेदरम्यान आढळून आली. पिंपरीमधील वायसीएम रुग्णालयात तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर ८३ तासांची शोधमोहीम अधिकृतरीत्या समाप्त करण्यात आली.
मोशी दुर्घटनेतील ८३ तासांच्या शोधमोहीमेचा घटनाक्रम
मोशीत ८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला.
या दुर्घटनेवेळी २३ जण अडकले होते. त्यातून ५ जण स्वतः सुखरूप बाहेर पडले. भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त बचावमोहीम सुरू केली. पहिल्या दिवसाच्या रात्री : सोमनाथ शेळके, सचिन दावडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंग, विजय सपकाळ, भूषण पाटील यांच्यासह एकूण ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर १० जुलै रोजी भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढला.
शनिवारी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रीटचा भाग तोडून आत प्रवेशाचा मार्ग तयार करण्यात आला. ११ जुलै रोजी दुपार ते रात्री या वेळेत अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२) आणि राहुल गायकवाड यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर १२ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले वामन कसबे यांचा मृतदेह सापडला.
दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा ९, तर ९ जणांची सुखरूप सुटका झाली. भारतीय सेना, एनडीआरएफच्या दोन तुकड्यांतील ९० जवान, डॉग स्क्वॉड, जेसीबी, पोकलेन, डंपर आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ८३ तास अखंड शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर १२ जुलै रोजी पहाटे सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर ८३ तासांची शोधमोहीम अधिकृतरीत्या समाप्त करण्यात आली.