पुण्याच्या मोशी दुर्घटनेत पहिला मृत्यू… एकूलता एक मुलगा गेला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, दीड वर्षापूर्वीच…

Moshi Building Collapse : मोशी येथील दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. भावेश मोहन वाणी असे मयत 34 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

पुण्याच्या मोशी दुर्घटनेत पहिला मृत्यू... एकूलता एक मुलगा गेला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, दीड वर्षापूर्वीच...
Moshi Building Collapse Death
Image Credit source: Google
| Updated on: Jul 10, 2026 | 6:06 PM

पुण्यातील मोशी येथील भीषण दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. भावेश मोहन वाणी असे मयत 34 वर्षीय तरुणाचे नाव असून तो घन कचरा प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या अँथोनी लारा कंपनीत लेखापाल होता. भावेश यांचे वडील मोहन वाणी व आई शालिनी वाणी दोघेही शिरसोली गावात राहतात, भावेश हा दोघांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबातील एकुलता एक असलेल्या भावेश याने दीड वर्षापूर्वीच संसार थाटल्यावर पुण्यातील निगडी मध्ये स्थायिक झाल्याची माहिती समोर आली आहे.

जळगावच्या तरुणाचा मृत्यू

पुण्याच्या मोशी परिसरात इमारत कोसळून झालेल्या घटनेत भावेशचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर गावातील सर्व नातेवाईक कुटुंबियांनी पुण्याकडे धाव घेतली. भावेश याच्यावर पिंपरी चिंचवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाला नोकरी लागल्यांतर या कुटुंबाला बरे दिवस आले होते. मात्र, दुर्दैवी घटनेत घरातील कर्ता मुलगा गेल्याने वाणी कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 8 जुलै रोजी दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी भावेश याने आपल्या पत्नीला जेवायला बसलो आहे असा मेसेज केला होता. हा मेसेज त्याच्या आयुष्यातील शेवटचा मेसेज ठरला आहे.

अजूनही 7-8 लोक अडकले

मोशी येथील या घटनेत 20 पेक्षा जास्त लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते, यातील काही जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर काहीजणांचा शोध अजूनही सुरू आहे. 48 तासांहून अधिक काळ उलटल्यानंतरही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात ते आठ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. यामुळे अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश वाढू लागला आहे. बचावकार्याच्या ठिकाणी आपल्या मुलाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका महिलेचा बांध फुटला. तिने माझ्या लेकराला एका तासात बाहेर काढा अशी आर्त हाक दिली. यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले.

दरम्यान, घटनास्थळी गेल्या 50 तासांपासून बचावकार्य सुरू आहे, मात्र NDRF ला बचाव कार्यांत अडथळे येत आहेत. कचऱ्याच्या ढिगामुळे मिथेन वायूचे प्रमाण जास्त असून ऑक्सिजन कमी आहे त्यामुळे रेस्क्यू टीमसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Follow Us