राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचा विश्वासू नेता अमित शाहांच्या भेटीला, दिल्लीत पत्र घेऊन…
शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीमध्ये अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही.

Sharad Pawar NCP : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर भविष्यात काहीही घडू शकतं, असं म्हटलं जातंय. ठाकरेंचे आमदारही भविष्यात आमच्याच पक्षात येणार असल्याचा दावा शिंदे गटातील नेते सातत्याने करत असतात. तर दुसरीकडे सध्या शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षदेखील लवकरच एनडीएत सामील होईल, असे सांगितले जात आहे. पवार यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी या शक्यता फेटाळून लावलेल्या आहेत. परंतु पडद्यामागे बरंच काहीतरी घडत असल्याचं सांगितलं जातंय. पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांची दिल्लीवारी वाढली आहे. असे असतानाच आता शरद पवार यांच्या जवळच्या मानल्या एका खासदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या खासदाराने एका पत्राच्या माध्यमातून काही मागण्या केल्या आहेत. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीमध्ये अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु बजरंग सोनवणे यांनी या भेटीत बीड जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न अमित शाहांपुढे मांडल्याचे बोलले जात आहे. याआधी पवार यांच्या पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अमित शाहांची दिल्लीतच भेट घेतली होती. या भेटीवेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत बजरंग सोनवणे उपस्थित होते. सुळे यांच्या या भेटीचीही महाराष्ट्राच्या राजकारणात सगळीकडे चर्चा झाली होती. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या सर्व भेटींच्या पार्श्वभूमीवर काहीतरी मोठं घडणार असल्याचा दावा केला जातो.
बजरंग सोनवणे यांनी अमित शाहांकडे कोणत्या मागण्या केल्या?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेत बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत एक पत्र दिले आहे. बीड जिल्हा कारागृहाबाबत गंभीर तक्रारी असल्याचं या पत्रात नमूद आहे. बीड जिल्हा कारागृहातील गैरप्रकारांच्या तक्रारींवर उच्चस्तरीय चौकश व्हावी, अशी मागणी सोनवणे यांनी आपल्या पत्रात केली आहे. काही कैद्यांना मोबाईल, प्रतिबंधित वस्तू व विशेष सुविधा दिल्याचे आरोप आहेत. तुरुंग प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जातोय. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, असेही सोनवणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता सोनवणे यांच्या या पत्राची कशी दखल घेतली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.