
राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण ठवळून निघाले आहे. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोललंच पाहिजे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज (8 जुलै) मनसे, ठाकरे गटाने मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते. दरम्यान, मनसे, ठाकरे गटाच्या या भूमिकेनंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेत्यांनी तर थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यानंतर आता आणखी एका खासदाराने राज ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला महाराष्ट्राच्या बाहेर काढून दाखवा, असे खुले आव्हानच या खासदाराने दिले आहे.
राज ठाकरे यांना खुले आव्हान देणाऱ्या खासदाराचे नाव राजीव राय असे आहे. राजीव राय हे समाजवादी पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी थेट ठाकरे बंधूंना खुले आव्हान दिले आहे. राय यांनी हे आव्हान दिल्यानंतर आता ठाकरे बंधू तसेच समस्त महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
राजीव राय यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हिंदी भाषा, मराठी भाषा, बॉलिवूड तसेच राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात तुमची राजकीय ताकद निर्माण का होऊ शकलेली नाही? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? गरीब हिंदी भाषिकांसोबत गुंडगिरी करणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे, असं राजीव राय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तसेच, हिंदी चित्रपटांमुळे बॉलिवुडला ओळख मिळाली. याच हिंदी चित्रपटांनी तुमच्या कुटुंबाची अब्जो रुपयांची कमाई झाली. या हिंदी चित्रपटांच्या विरोधात तुम्ही का बोलत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला मुंबईच्या बाहेर काढून दाखवा, असे खुले आव्हानही राजीव राय यांनी राज ठाकरे यांना दिले. तसेच गरीब हिंदी भाषिक लोक पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात जात असतील तर हजारो मराठी कुटुंब हे हिंदी सिनेमांच्या मदतीनेच जीवन जगतात, असा दाखला राजीव राय यांनी दिला.
मराठी भाषा ही संस्काराची भाषा आहे. या देशातील एखादा भाग फक्त भाषेच्या मुद्द्यावरून कोणाच्याही बापाचा होऊ शकत नाही. देशातील प्रत्येक भागावर प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तुमच्या एकट्याचे नाहीत तर ते संपूर्ण देशाचे हिरो आहेत, असेही राजीव राय म्हणाले.
लक्षात ठेवा या देशाची संस्कृती अतिथी देवो भव: अशी आहे. तुम्ही करत असलेल्या गुंडगिरीवर औषध आहे. सगळं काही ठीक होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही थोडं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असा सल्लाही राजीव राय यांनी राज ठाकरे यांना दिलाय.
प्रिय राज ठाकरे !
कभी सोचा है आपने कि अभी तक महाराष्ट्र में आपकी राजनैतिक ताक़त क्यों नहीं बनी?जब कोई पूछता नही है तो मीडिया में आने के लिए ग़रीब हिन्दी भाषियों के साथ गुंडागर्दी करना आपकी कायरता की निशानी है ।
जिस हिंदी फ़िल्मों से आपके परिवार की अरबों की कमाई हुई, हिंदी…
— Rajeev Rai (@RajeevRai) July 8, 2025
दरम्यान, आता राजीव राय यांच्या या घणाघाती टीकेनंतर मनसे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा, असे खुले आव्हान निशिकांत दुबे यांनी दिले होते. त्यानंतर आता राजीव राय यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे.