Sanjay Raut : राजन साळवींची पक्ष सोडण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले, ‘संकटकाळात जे…’

"मागच्या 30-35 वर्षात या पक्षाने ठाकरे परिवाराने आम्हाला काय दिलं? हा त्यांनी विचार केला पाहिजे. इतकं करुन कोणी जाणार असेल तर दुसरी काय भूमिका असू शकते, या राजकारणात तुम्ही स्थिरावलात ते ठाकरे परिवाराच्या शिवसेनेमुळे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे नाही, याचा विचार जाणाऱ्यांनी खरोखर केला पाहिजे. या उपर कोणाला जायचं असेल, तर आम्ही रोखणारे कोण? आम्ही आम्ही प्रयत्न करतोय, चर्चा करतोय, थांबवायचा प्रयत्न करतोय. जाणाऱ्या प्रत्येकाचं कारण वेगळं आहे" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : राजन साळवींची पक्ष सोडण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले, संकटकाळात जे...
Rajan Salvi-Sanjay Raut
| Updated on: Jan 31, 2025 | 10:52 AM

“या देशात वाईल्ड लाइफ प्रोटेक्शन Act आहे, त्या अंतर्गत सेव्ह टायगर अशी सुद्धा एक योजना आहे. जे टायगर आहेत, त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. आता जे ऑपरेशन टायगर आहे, ते वाईडल्ड कॅट्स म्हणतात. इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कोणी असेल तर मला माहित नाही. मला कोणाची नाव घ्यायची नाहीत. जी नावं तुम्ही घेताय, त्यांना आमच्या शुभेच्छा” असं खासदार संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे गटातून अजून काही नेते बाहेर पडू शकतात, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. “अनेक वर्ष जे शिवसेनेत होते, अनेक वर्ष शिवसेनेत कामं केली. शिवसेनेने त्यांना पद-प्रतिष्ठा दिली. तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणताय जो पर्यंत अशा प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत, तो पर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.

“आपण उदय समांत यांचं नाव घेताय त्यांनी ऑपरेशन टायगर सुरु केलय. त्यांचच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही. हा भाजपा आहे. सध्या याच प्रकारच राजकारण देशभरात सुरु आहेत. सत्ता, पैसा तपाय यंत्रणांची कारवाईची भिती यातून हे होतय आम्ही यावर लक्ष ठेऊन आहोत” असं संजय राऊत म्हणाले. माजी आमदार राजन साळवी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यांना थांबवण्यासाठी काही प्रयत्न होतोय का? यावरही संजय राऊत बोलले.

‘आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवतो’

“माझं आणि त्यांचं काल बोलणं झालं. सुनीत राऊत आणि त्यांचं बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यातून असं जाणवत नाही. ते अजूनही म्हणतात मी बाळासाहेब ठाकरेंचा पक्का शिवसैनिक आहे. माझ्या डोक्यात असा कोणताही विचार नाही, असं ते वारंवार सांगतायत आणि आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवतो. तुम्ही जे सांगत आहात, ते भविष्यात घडल्यावर त्यावर भाष्य करु. संकटाकाळात जे पळून जातात, त्यांची इतिहासात नोंद ठेवली जात नाही. पक्ष आज संघर्ष करतोय” असं संजय राऊत म्हणाले.

‘तुम्ही जेव्हा आईला सोडून जाता, तेव्हा…’

“कालच राज ठाकरेंनी भूमिक मांडली, मतं कुठे गायब झाली ते कळत नाही हे रहस्य आहे. तेच, माणस ज्या पद्धतीने फोडली जातायत त्यामध्ये सुद्धा तसच रहस्य आहे. अशी कोणती जादू आहे, कोणती जादूची कांडी आहे की, लोक त्यांच्याकडे जात आहेत. अस कोणतं महान कार्य त्यांनी केलय. ही संघटना माननीय हिंदूह्दयसम्राटांची आहे, तुम्ही जेव्हा आईला सोडून जाता, तेव्हा गंगेत कितीही डुबकी मारली तरी पाप धुतली जात नाही” असं संजय राऊत म्हणाले.

‘जाणाऱ्या प्रत्येकाचं कारण वेगळं’

ज्या बैठका होतात त्यात उद्धव ठाकरे बोलतात, ज्यांना जायचय त्यांनी जा, त्यावर संजय राऊत बोलले की, “उद्धव ठाकरे असं कधी म्हणणार नाहीत. मी स्वत: अनेक बैठकांना उपस्थित असतो. आपण घडवलेले कार्यकर्ते अशा पद्धतीने जातात हे पाहून वाईट वाटतं. राजूल पटेल गेल्या याचं दु:ख झालं. जाणाऱ्यांनी विचार केला पाहिजे”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us