लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत, एसटीच्या आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी, ई-पासची गरज नाही
राज्यातील आंतरजिल्हा एसटी वाहतुकीला परवानगी देण्यात आली (MSRTC Bus Service Restart again) आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
मुंबई : गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेली लालपरी उद्यापासून पुन्हा सेवेत दाखल होणार आहे. राज्यातील आंतरजिल्हा एसटी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची गरज लागणार नाही. सुरुवातीला अंशत: एसटी सेवा सुरु केली जाणार आहे. त्यानंतर पुढे टप्प्याटप्प्याने ही सेवा वाढवली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. (MSRTC Bus Service Restart again)
कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 5 महिन्यांपासून एसटीची आंतरराज्य आणि राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी आंतरजिल्हा बससेवा उद्या 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोविड१९ च्या काळात महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरीची सेवा बंद ठेवण्यात आली होती. मधल्या काळात जिल्ह्याच्या सीमा न ओलांडता सेवा सुरू करण्यात आली. आज महाराष्ट्र पूर्वपदावर येत असताना आंतरजिल्हा सेवेचा पुन:श्च हरी ओम करण्यात येत असून लालपरी पुन्हा पूर्वीप्रमाणेच सेवा देणार आहे. pic.twitter.com/I64T3F0C2z
— Anil Parab (@advanilparab) August 19, 2020
- एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरु होणार
- मूळ तिकीट दरात ही वाहतूक सेवा
- लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध
- प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही.
- कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक
- दररोज 1300 बसेसच्या सरासरी 7287 फेऱ्या
- अंदाजे दीड लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवासी सेवा
उद्यापासून एसटीची साधी,निमआराम,शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील त्यातील लांब व मध्यम पल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध होतील. या प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची आवश्यकता नसेल व कोणतेही ज्यादा दर आकारले जाणार नाहीत.
— Anil Parab (@advanilparab) August 19, 2020
गेल्या 23 मार्चपासून कोव्हिड 19च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. (MSRTC Bus Service Restart again)
संबंधित बातम्या :
कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेनकडे चाकरमान्यांची पाठ, रत्नागिरीत 2 ट्रेनमधून केवळ 27 प्रवाशी उतरले
एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार, लवकरच पेट्रोल-डिझेलची विक्री