
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ लवकरच एक मोठा बदल करणार आहे. गेल्या काही वर्षांतील आर्थिक चणचण आणि बसेसची कमतरता यावर मात करण्यासाठी परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीला नवसंजीवनी देणारा कृती आराखडा जाहीर केला आहे. यानुसार एसटीच्या ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल होणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपयांचा डिजीटल प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
कोरोनापूर्व काळात एसटीकडे सुमारे १९,००० बसेस होत्या. मात्र निवृत्त होणाऱ्या बसेस आणि नवीन खरेदी अभावी ही संख्या १२,६०० पर्यंत खाली आली होती. आता शासनाने टप्प्याटप्प्याने बसेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ बसेस सुरु करण्यात येणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून ३,००० नवीन ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस ताफ्यात येतील. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर धावतील.
तसेच ग्रामीण व दुर्गम भागात ५,००० साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुर्गम व आदिवासी भागासाठी १०० मिडी बसेसही दाखल केल्या जाणार आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी २०० अत्याधुनिक (Premium) बसेसची खरेदी केली जाणार आहे.
सध्या एसटीला दररोज १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. सध्या एसटीचा खर्च ३५ कोटी असून त्याचे उत्पन्न ३३.५ कोटी इतके आहे. मात्र, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास या योजनांमुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. “बसेस वाढल्या की प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले की उत्पन्न वाढून एसटी या वर्षाखेर आर्थिक गर्तेतून बाहेर येईल,” असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपये खर्चून डिजीटल सुरक्षा कवच तयार करण्यात येत आहे. राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी (बसस्थानके, आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा) एकूण ७,०३५ कॅमेरे बसवले जातील. यात पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. मुंबईत उभारलेल्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यातील हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. टेलिकम्युनिकेशन इंडिया लिमिटेड ही संस्था या प्रकल्पाचे काम पाहत आहे.
दरम्यान सध्या एसटीने दररोज ५० लाख प्रवासी प्रवास करतात. नवीन ८,३०० बसेस ताफ्यात आल्यानंतर हे लक्ष्य ७० ते ७५ लाखांपर्यंत नेण्याचे महामंडळाचे मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.