Maharashtra Politics | हा ऊन सावलीचा खेळ, सरकार पाडण्याचं स्वप्न सत्यात उतरणं अद्याप दूर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलंचं वक्तव्य!

| Updated on: Jun 21, 2022 | 11:19 AM

गुजरात भाजपच्या मदतीनं महाराष्ट्रातील विरोधी बाकावर असलेल्या भाजपच्या वतीनं ही खलबतं सुरु आहेत. तर इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावरही काल रात्रीपासून महाविकास आघाडीतील मंत्री आणि आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे.

Maharashtra Politics | हा ऊन सावलीचा खेळ, सरकार पाडण्याचं स्वप्न सत्यात उतरणं अद्याप दूर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलंचं वक्तव्य!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) आलेलं संकट हे फार गंभीर नसून असा ऊन सावलीचा खेळ सुरुच राहतो, हेही संकट काही दिवसांचंच आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपची (Maharashtra BJP) मोठ्या प्रमाणावर खलबतं सुरू असताना महाविकास आघाडीच्या सदस्यांनाही तातडीनं मुंबईत दाखल होण्यास सांगण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले हेदेखील मुंबईच्या दिशेने निघाले असून राज्यातील आमदारांच्या बंडावर येथे चर्चा होणार आहे. त्यानंतरच खरी परिस्थिती लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

काय म्हणाले नाना पटोले?

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, ‘ हे थोड्या वेळाचं आहे. ऊन आणि सावली हा निसर्गाचा नियम आहे. महाराष्ट्रावर आलेलं ऊनही सावलीत रुपांतरीत होईल. या सगळ्या घटना रात्रीच्या आहेत. मुंबईला सर्व काँग्रेस नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. आम्ही सर्वजण तिथे पोहोचल्यावर यासंबंधी चर्चा होईल…’

दिवसाची स्वप्न साकारणं दूर…

बहुमताचा आकडा बारीक करायला, दिवसाची स्वप्न पहणाऱ्या लोकांसाठी ते सत्यात उतरणं अजून दूर आहे. महाविकास आघाडीला कुठलीही अडचण आहे, असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली.

चंद्रकांत हांडोरेंच्या पराभवावर…

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसमधील बंडामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निकाल लागण्यापूर्वीच मुंबईतून नागपूरला रवाना झाले होते. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पडणार असल्याची कुणकुण त्यांना लागली असावी, अशी चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, ‘ आमच्या पक्षात जी बंडखोरी झाली आहे, त्याचं आत्मपरीक्षण करून हायकमांडला माहिती दिली जाईल….

एकनाथ शिंदेंचं बंड, सरकार धोक्यात!

विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये मुक्कामी गेले असून त्यांच्यासोबत जवळपास 29 आमदारांचा जथ्था असल्याची माहिती आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या एवढ्या आमदांना एकाच वेळी बंड पुकारलं तर महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. गुजरात भाजपच्या मदतीनं महाराष्ट्रातील विरोधी बाकावर असलेल्या भाजपच्या वतीनं ही खलबतं सुरु आहेत. तर इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावरही काल रात्रीपासून महाविकास आघाडीतील मंत्री आणि आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे.