
Mumbai Monorail News : संपूर्ण मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प झालेली आहे. अशा स्थितीत चाकरमानी जमेल त्या मार्गाने प्रवास करत आहेत. काही प्रवाशांनी मोनोरेलने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंबूर-भक्तीमार्गादरम्यान मोनोरेल तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जागीच थांबल्याचा गंभीर प्रकार समोर आला. विशेष म्हणजे ही मोनोरेल एका बाजूला झुकली होती. तसेच मधील एसी, लाईट बंद पडल्यामुळे प्रवाशांत घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. श्वास गुदमरत असल्याने अनेक प्रवाशी बेशुद्ध होण्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या मोनोरेलमधून प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आले असून हरिशंकर नावाच्या एका प्रवाशाने मध्ये नेमकं काय घडलं होतं? याबाबत सांगितलं आहे. या प्रवाशाने एमएमआरडीएच्या नियोजनावर संताप व्यक्त केला आहे.
बंद पडलेल्या मोनोरेलमधून रेस्क्यू केल्यानंतर हरिशंकर नावाच्या प्रवाशाने एएनआयला प्रतिक्रिया दिली. त्यांनी मध्ये नेमकं काय-काय घडलं? याबाबत सविस्तर सांगितलं आहे. मोनोरेल अचानकपणे थांबल्यामुळे आतील प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. अजूनही अनेक महिला मोनोरेलमध्येच फसलेल्या आहेत. त्यांनाही श्वास घेण्यास त्रास होत आहे. शेवटी-शेवटी आम्ही आतून मोनोरेलची खिडकी तोडली आहे. ही खिडकी तोडल्यानंतर आम्हाला श्वास घ्यायला हवा मिळाली. साधारण एका तासापासून मोनोरेल थांबवलेली होती. ही मोनोरेल प्रवाशांनी गच्च भरलेली होती. त्यामुळे येत असलेली हवा आमच्यासाठी पुरेशी नव्हती, अशी हकीकत त्यांनी सांगितली.
तसेच, लोकल सेवा पावसामुळे बंद आहे. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. मात्र मोनोरेलची सेवा ही नेहमीच खराब राहिलेली आहे. या मोनोरेलमध्ये नेहमीच काहीतरी अडचण येते. मध्येच ही मोनोरेल बंद पडते. मोबाईल क्रमांकावर तक्रार करताच मेल करा असे सांगितले जाते. प्रवाशी मोनोरेलमध्ये अडकल्यानंतर तशा स्थितीत प्रवाशी कसा मेल करू शकतो, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
मध्ये महिला रडत होत्या. लोकांचे श्वास गुदमरत होते. लोक बेशुद्ध होण्याची स्थिती निर्माण झाली होती. सगळे मिळून अन्य प्रवासी महिलांचा समजून सांगत होत्या. मोनोरेलच्या प्रवाशांना व्यवस्थित प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. मोनोरेलच्या इंजिनला आग लागली असती तर काय झाले असते? असा सवाल प्रवाशाने उपस्थित केला आहे. एमएमआरडीएने स्वत:मध्ये सुधारण करण्याची गरज आहे, असा रागही प्रवाशांनी व्यक्त केला. बाहेरून आम्हाला सूचना दिली जात होती. पण काच बंद असल्यामुळे आम्हाला काहीच समजत नव्हते. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, असेही एका प्रवाशाने सांगितले.