मुंबई-पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा दूर, पण या मार्गाला मिसिंग लिंक का म्हणतात?

महाराष्ट्र दिनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर ६ किमीने कमी झाले असून ३० मिनिटांची बचत होणार आहे. जाणून घ्या याला 'मिसिंग लिंक' का म्हणतात आणि या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये.

मुंबई-पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा दूर, पण या मार्गाला मिसिंग लिंक का म्हणतात?
Mumbai Pune Expressway Missing Link
| Updated on: May 02, 2026 | 8:17 AM

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल ६ हजार ९९५ कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नसून, पुणे-मुंबई प्रवासातील सर्वात मोठा अडथळा दूर करणारा मार्ग ठरणार आहे.

या प्रकल्पाला ‘मिसिंग लिंक’ का म्हटले जाते?

‘मिसिंग लिंक’ म्हणजे तांत्रिकदृष्ट्या गहाळ झालेला दुवा. जेव्हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची निर्मिती झाली, तेव्हा खोपोली ते लोणावळा (कुसगाव) दरम्यानचा सुमारे १३.३ किमीचा घाट विभाग तांत्रिक अडचणी आणि अवाढव्य खर्चामुळे थेट एक्स्प्रेस वे म्हणून विकसित करता आला नव्हता. त्यावेळी या तुकड्यासाठी जुन्या राष्ट्रीय महामार्ग ४ (आताचा NH-48) चा आधार घ्यावा लागला. एक्सप्रेस वेचे सहा पदरी रस्ते या घाटात येऊन जुन्या महामार्गाला मिळत असल्याने तिथे वाहनांची प्रचंड गर्दी होत असे. उर्वरित एक्सप्रेस वे वेगवान असूनही हा छोटा भाग संथ आणि धोकादायक होता. हा जो अपूर्ण दुवा प्रवासाचा वेग मंदावत होता, त्यालाच मिसिंग लिंक असे म्हटले जाते.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे घाटातील वळणदार रस्ता आता थेट आणि सरळ झाला आहे. प्रवाशांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी १.७५ किमी आणि ८.९ किमी लांबीचे दोन अवाढव्य बोगदे बांधण्यात आले आहेत. तसेच टायगर व्हॅलीवर ६५० मीटर लांबीचा दिमाखदार केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे, जो या मार्गाचे मुख्य आकर्षण आहे. तसेच खोपोली एक्झिट जवळ ८40 मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.

प्रवाशांना होणारे फायदे

१. वेळेची मोठी बचत: जुन्या मार्गाने खोपोली ते कुसगाव पार करण्यासाठी ४५ ते ६० मिनिटे लागत असत. आता हा प्रवास केवळ १५ ते २० मिनिटांत पूर्ण होईल, म्हणजेच सुमारे ३० मिनिटांची थेट बचत होईल.

२. अंतरात घट: नवीन मार्गामुळे प्रवासाचे अंतर ५.७६ किलोमीटरने कमी झाले आहे.

३. सुरक्षित प्रवास: खंडाळा घाटातील तीव्र वळणे आणि धोकादायक चढ-उतार आता टाळता येणार असल्याने अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल.

४. कोंडीतून सुटका: एक्स्प्रेस वे आणि जुना महामार्ग यांची वाहतूक वेगळी झाल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात होणारी वाहतूक कोंडी आता इतिहास जमा होणार आहे.

Follow Us