मुंबई-पुणे प्रवास आता फक्त 48 मिनिटांमध्ये, प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. आता मुंबई-पुणे प्रवास होणार फक्त 48 मिनिटांमध्ये. जाणून घ्या सविस्तर

मुंबई-पुणे प्रवास आता फक्त 48 मिनिटांमध्ये, प्रवाशांना मोठा दिलासा
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 03, 2026 | 4:17 PM

Mumbai Pune High Speed Rail : केंद्रीय अर्थसंकल्प 2025–26 मध्ये महाराष्ट्रासाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे यांच्यात बुलेट ट्रेन धावणार असल्याचं जाहीर करण्यात आलं असून त्यामुळे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील रेल्वे प्रवासाचा वेळ थेट अवघ्या 48 मिनिटांवर येणार आहे. सध्या मुंबई–पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी साधारणत 4 तासांचा वेळ लागतो.

अर्थमंत्री यांनी जाहीर केलेल्या हाय-स्पीड रेल कॉरिडोर्समध्ये मुंबई–पुणे मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावर बुलेट ट्रेनसारख्या अतिवेगवान गाड्या धावतील. या ट्रेनची संभाव्य गती 300 ते 320 किलोमीटर प्रतितास इतकी असणार आहे.

दररोज प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई–पुणे हा मार्ग नेहमीच अत्यंत वर्दळीचा राहिला आहे. हजारो नागरिक दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि अन्य कामांसाठी या दोन शहरांदरम्यान प्रवास करतात. अनेक जण रोज मुंबई–पुणे अप-डाऊन करतात. बुलेट ट्रेन सुरू झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्याच्या स्थितीत, बोरीवली ते चर्चगेट इतका वेळ लागतो, तेवढ्याच वेळेत प्रवासी मुंबईहून थेट पुण्यात पोहोचतील असं चित्र या प्रकल्पामुळे उभं राहणार आहे.

मुंबई–पुणे हाय-स्पीड रेल कॉरिडोर सुरू झाल्यानंतर केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही तर आर्थिक, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. विशेषतः प्रस्तावित मुंबई–पुणे–हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरमुळे आयटी, उद्योग, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राला थेट चालना मिळेल.

मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही तीनही शहरे देशातील महत्त्वाची आर्थिक आणि तांत्रिक केंद्रे आहेत. या शहरांमधील जलद आणि विश्वासार्ह कनेक्टिविटीमुळे नवीन गुंतवणूक, रोजगाराच्या संधी आणि औद्योगिक विकासाला वेग मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रस्ते आणि हवाई वाहतुकीवरील वाढता ताणही कमी होणार आहे.

मुंबई–पुणे मार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी

सध्या मुंबई–पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक असते. मध्य रेल्वेकडून दररोज पहाटे 5 विशेष गाड्या चालवण्यात येतात. ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे. मात्र तरीही तिकिटे कन्फर्म होणं अनेकदा कठीण ठरतं. याशिवाय मोठ्या प्रमाणात प्रवासी मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करतात. खासगी वाहनं, बस, शेअरिंग कॅब्स यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. माहितीनुसार, या एक्सप्रेसवेवर दररोज सरासरी 43 हजार वाहनांची ये-जा होते.