Mumbai Rain Updates : लिफ्ट बंद, लाईटही गुल; धुवांधार पावसामुळे कोट्यवधीच्या घरात मुंबईकर ‘कैद’

मुंबईतील बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, वांद्रे आणि दक्षिण मुंबई यांसारख्या अत्यंत उच्चभ्रू भागांतही - जिथे एकेका चौरस फुटासाठी भाव 50 हजार - 1 लाख्चाय घरात आहे, अशा परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं दिसून आलं. आहे. रहिवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Mumbai Rain Updates : लिफ्ट बंद, लाईटही गुल; धुवांधार पावसामुळे कोट्यवधीच्या घरात मुंबईकर कैद
पावसामुळे मुंबईकरांची दैना
| Updated on: Jul 07, 2026 | 12:09 PM

मुंबईत तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सगळ्यांचा त्रेधातिरपीट उडाली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं असून काही इमारतीच्या परिसरातही तळ्याचं स्वरूप आलंय. तुमच्याकडे कोट्यवधी रुपये किमतीचं का आलिशान घर असेना, त्यामुळेहूी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांपासून सुरक्षिततेची हमी मिळू शकत नाही, हेच या पावसातून सिद्ध झालंय. शहरातील अत्यंत महागड्या आणि प्रीमियम निवासी प्रोजेक्टमध्येही पाणी झिरपणं, बेसमेंट पाण्याखाली जाणं आणि पाणी साचणं यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असून त्याचे व्हिडिओ आणि पोस्ट्सनी X (ट्विटर) आणि Reddit सारखी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स भरून गेल्याचं दिसून आलं.

‘X’ (ट्विटर) वर एका व्यक्तीने आलिशान इमारतींमधील रहिवाशांचे हाल आणि शहरातील कमकुवत पायाभूत सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका 21 मजली ​​इमारतीमधील जनरेटर 24 तासांहून अधिक काळापासून बंद पडल्यामुळे लिफ्ट्सही सुरू नाहीयेत, असं त्याने लिहीलंय. जर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रहिवाशांना वीज आणि स्वच्छ पिण्याचे पाणी यांसारख्या बेसिक सुविधांपासून वंचित राहावं लागत असेल. एवढंच नव्हे तर जीवघेणे खड्डे आणि पाणी साचण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल आणि व्यवस्थेशी संघर्ष करावा लागत असेल, तर अशा गगनचुंबी इमारतींचा काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी पोस्टमधून विचारला आहे. त्यांची नाराजी या पोस्टमधून स्पष्ट दिसून येत होती.

जिकडे बघावं तिकडे, आजूबाजूला फक्त उंचच उंच इमारती दिसतायत खऱ्या, पण खाली उतरल्यावर दिसतं ते की अगदी गुडघ्यापर्यंत पाणी भरलंय. आणि स्टेशनला जाण्यासाठी देखील लोकांना रिक्षाच्या लांबच लांब रांगांमध्ये उभं राहून वाट पहावी लागत आहे. लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम करणारे हे मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरित आहेत; तरीही, मुंबईत मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव असूनही कोट्यवधी रुपये किमतीची घरे वेगाने विकली जात आहेत.

पावसामुळे लोकं हैराण

याच मुद्यावरून अनेकांनी कमेंट्स तसेच पोस्टही केल्या आहेत. हे रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नेमकी कोणाला देण्यात आली होती आणि प्रत्यक्ष काम कोणी केले, याबद्दल पूर्ण पारदर्शकता आणण्याची वेळ आता आली आहे, असं एका युजरने लिहीलं आहे. जेव्हा एखादा सामान्य नागरिक इन्कम टॅक्स रिटर्न भरतो, तेव्हा सरकार त्याच्याकडून पै अन् पैशाचा हिशोब आणि लहान-मोठी सर्व माहिती मागतं. मात्र दुसरीकडे, कोट्यवधी रुपयांची सरकारी कंत्राटे आणि प्रकल्प मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहतात आणि त्याबाबत कोणतीही जबाबदारी घेतलीजात नाही, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका केवळ झोपडपट्ट्या किंवा सामान्य वस्त्यांनाच बसत नाही, तर कोट्यवधी रुपयांच्या आलिशान सदनिकांमध्ये राहणारे श्रीमंत लोकांनाही त्यामुळे त्रास होते, हे या परिस्थितीवरून स्पष्ट होतं. उंच इमारतींमधील लिफ्ट बंद पडल्यास, वरच्या मजल्यांवर राहणारे वृद्ध आणि आजारी रहिवासी आपल्याच घरात अडकून पडतात. आणि त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होते.

एक्स्पर्टचं म्हणणं काय ?

संभाव्य खरेदीदारांना, त्या प्रॉपर्टीचा खरा दर्जा तपासण्याची सर्वोत्तम संधी पावसाळ्याच्या काळात मिळते, असं रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. वर्षाच्या इतर काळात लपून राहिलेल्या त्रुटी मुसळधार पावसामुळे स्पष्टपणे दिसून येतात; त्यामध्ये पाणी साचणे, भिंतींमधून पाणी झिरपणे (सीपेज), निचऱ्याची सदोष व्यवस्था, खिडक्यांमधून पाणी गळणे आणि लिफ्ट बंद पडणे यांसारख्या समस्यांचा समावेश असतो. म्हणूनच, या काळात केवळ अपार्टमेंटचीच नव्हे, तर संपूर्ण इमारतीची पायाभूत सुविधा आणि देखभालीची स्थिती यांचीही सखोल पाहणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 

Follow Us