110 कोटी खर्चूनही सीसीटीव्ही कुचकामी, नवी मुंबईतील महिलेच्या हत्येनंतर सत्य उजेडात

| Updated on: Mar 04, 2020 | 7:30 AM

उलवा सेक्टर 19 येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे दिवसा बंद आणि रात्री चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भागात एका महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे (CCTV not Working).

110 कोटी खर्चूनही सीसीटीव्ही कुचकामी, नवी मुंबईतील महिलेच्या हत्येनंतर सत्य उजेडात
Follow us on

नवी मुंबई : सिडकोने वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरात 110 कोटी रुपये खर्च करुन सीसीटीव्ही बसवले. सिडकोने चार वर्षांपूर्वी सीसीटीव्हीचे 110 कोटी रुपयांचे कंत्राट मे. विप्रो लि. कंपनीला दिलं होतं. मात्र, सिडकोची ही योजना फोल ठरल्याचं उघडकीस आलं आहे (CCTV not Working). उलवा सेक्टर 19 येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे दिवसा बंद आणि रात्री चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भागात एका महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे (CCTV not Working).

प्रभावती भगत या काल (सोमवार, 2 मार्च) दुपारी दोनच्या सुमारास उलवा सेक्टर 19 येथे कारमध्ये बसून आपल्या पतीची वाट बघत होत्या. त्यांचे पती बाळकृष्ण बँकेत गेले होते. यावेळी तिथे काही अज्ञात तरुण आले. प्रभावती गाडीत असतानाच मारेकऱ्यांनी ती कार पळवली. पुढे चौकाजवळ मारेकऱ्यांनी प्रभावती यांच्यावर गोळ्या झाडात त्यांची हत्या केली. त्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले. प्रभावती यांचे पती बँकेतून बाहेर आले तेव्हा त्यांना कार बँकेबाहेर दिसली नाही. त्यांनी पत्नी आणि कारचा शोध सुरु केल्यानंतर कार वहाळ गावाजवळ असल्याचे आणि त्यांच्या पत्नीवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केल्याचे त्यांना समजले.

या घटनेचा माहिती मिळताच एनआरआय पोलीस आणि क्राइम ब्रांच टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरु करण्यात आला. तपासात मयत प्रभावती यांच्या घरापासून ते उलवा परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, काही भागातील सीसीटीव्ही कॅमेरे चालू तर काही भागांमधील बंद असं दिसून आलं. विशेष म्हणजे घटनास्थळाजवळ एक चौक आहे. त्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे हे दिवसा बंद तर रात्री चालू असल्याचं उघडकीस आलं आहे.

दरम्यान, प्रभावती यांच्याजवळ जवळपास 500 ग्रॅम दागिने होते. त्यापैकी एकही ग्रॅम लुटलं न गेल्यामुळे त्यांच्या हत्येमागील गूढ वाढलं आहे. प्रभावती भगत यांची हत्या अन्य कारणावरुन करण्याती आली आहे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. या घटनेतील मारेकरी सापडल्यानंतरच या हत्येमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलसांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात मारेकरी किती होते? याबाबतही पोलिसांना अद्याप ठोस अशी माहिती मिळालेली नाही. एनआरआय पोलिसांनी या घटनेतील अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. त्यासाठी पोलिसांनी उलवे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरु केली होती. मात्र, घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांना पुरीशी माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा : देशातील सर्वात उंच गांधींजींचा पुतळा महाराष्ट्रात, पुतळ्यासाठी 35 टन भंगाराचा वापर