Raj Thackeray : जुन्या 44 टोलनाक्यांचं काय होणार?; राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीतील मोठा निर्णय काय?

टोलनाक्यावर ज्या लोकांची वसुलीसाठी नियुक्ती केली जाते. त्यांची पार्श्वभूमीवर तपासल्या जाईल. त्याशिवाय त्यांची नियुक्ती होणार नाही. त्यासाठी आदेश दिले जाणार आहेत. तसेच प्रवाशांशी सौजन्याने वागण्यासही सांगण्यात येणार आहे, असं दादा भुसे यांनी सांगितलं.

Raj Thackeray : जुन्या 44 टोलनाक्यांचं काय होणार?; राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीतील मोठा निर्णय काय?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2023 | 10:55 AM

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यातील टोलनाक्याबाबतची चर्चा यशस्वी झाली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. या बैठकीनुसार राज्यातील जुने 44 टोलनाके बंद करण्यात येणार आहेत. त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्याचा अवधी मागून घेतला आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी टोलच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री दादा भुसे यांच्यात बैठक झाली. शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा दोन तास बैठक झाली. यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार गैरहजर होते. या बैठकीत टोलच्या संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 असे 44 जुने टोलनाके बंद करण्यात यावेत अशी आमची मागणी होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे टोलनाके बंद होतील अशी आशा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

कॅमेरे लावणार

मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉइंटवर येत्या 15 दिवसात सरकार सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहेत. त्याचा कंट्रोलरुम मंत्रालयात असणार आहे. आमचेही सीसीटीव्ही कॅमेरे एन्ट्री पॉइंटवर असणार आहे. या टोलनाक्यावरून किती गाड्यांची ये जा होते हे मोजले जाणार आहे. टोल वाढणार, गाड्यांची संख्या वाढणार हे किती काळ सुरू राहणार आहे? असा सवाल करतानाच ही व्हिडीओग्राफी उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

नऊ वर्षानंतर पुन्हा मुद्दा ऐरणीवर

काल सह्याद्रीला बैठक झाली. तिथे काही गोष्टी ठरल्या. पण ज्या लेखी स्वरुपात आल्या नव्हत्या. तिथे असं ठरलं की आज एक बैठक घेऊन लेखी स्वरुपात काही गोष्टी आणाव्यात. नऊ वर्षानंतर मी टोलच्या विषयासाठी मी सह्याद्रीला गेलो होतो. नऊ वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी काही गोष्टी ठरल्या होत्या. काही सुरू झाल्या. त्याचवेळी मला समजलं होतं टोलचे करार 2026ला संपणार आहे. ती नवीन गोष्ट नव्हती. पण काही सुधारणा होणं गरजेचं होतं. त्यावेळी जे करार झाले त्यातही काही चुकीच्या गोष्टी होत्या. पण ते करार बँकेसोबत झाल्याने त्यात काही करता येत नव्हते. पण त्यावेळी काही सुधारणा व्हायला हव्या होत्या. त्या झाल्या नाहीत, असं राज यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us